RTE Admission Pudhari
मुंबई

RTE Admission: राज्यभरात आरटीई प्रवेश प्रक्रियेला यंदा कमी प्रतिसाद! 30 एप्रिलपर्यंत प्रवेशाची अंतिम मुदत

कागदपत्रांच्या त्रुटींमुळे पालकांना अनेक अडथळे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यात बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रियेला यंदा अपेक्षित वेग मिळताना दिसत नाही, कागदपत्रांतील त्रुटी आणि पालकांच्या अपुऱ्या प्रतिसादामुळे प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. निवड यादी जाहीर होऊन आठवडा उलटला असतानाही केवळ 39 हजार 215 विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत, तर 1 लाख 5 हजार 811 पात्र विद्यार्थ्यांपैकी तब्बल 60 टक्क्यांहून अधिक प्रवेश अजून झालेले नाहीत.

आरटीई अंतर्गत यंदा राज्यातील 8 हजार 701 शाळांमध्ये प्रवेशासाठी 2 लाख 89 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 1 लाख 5 हजार 811 विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे पहिली निवड जाहीर झाली; मात्र प्रत्यक्ष प्रवेशाच्या टप्प्यावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

प्रवेश प्रक्रिया सुरू असली, तरी पडताळणी समित्यांकडे येणाऱ्या पालकांकडून सादर होणाऱ्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी आढळत आहेत. अर्जात नमूद केलेली माहिती आणि प्रत्यक्ष सादर केलेली कागदपत्रे यात विसंगती असल्याने, त्रुटी दूर केल्याशिवाय प्रवेश निश्चित करण्यास परवानगी दिली जात नाही. परिणामी, प्रक्रिया लांबणीवर पडत आहे.

निवड झालेल्या पालकांना मोबाईलवर एसएमएसद्वारे सूचना दिल्या जात असल्या, तरी केवळ एसएमएसवर अवलंबून अनेक पालक असल्याने प्रवेशाच्या माहितीपासून दूर आहेत.

अनेक पालकांनी आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती तपासली नसल्याने, लॉटरी लागूनही वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही. ज्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा पालकांनी अर्जातील सर्व कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती, अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि हमीपत्र सोबत घेऊन पडताळणी समितीकडे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

  • मुंबईत 10 हजार 383 अर्जांपैकी 4 हजार 941 विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यापैकी 2 हजार 554 प्रवेश निश्चित झाले आहेत. रायगड जिल्ह्यात 9 हजार 489 अर्जांपैकी 4 हजार 345 निवडी झाल्या, मात्र 1 हजार 285 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. ठाणे जिल्ह्यात 25 हजार 21 अर्जांपैकी 10 हजार 578 निवडी असून, 3 हजार 650 प्रवेश निश्चित झाले. पालघर जिल्ह्यात 5 हजार 385 अर्जांपैकी 3 हजार 183 विद्यार्थ्यांची निवड होऊन 1 हजार 729 प्रवेश पूर्ण झाले. प्रवेशामध्ये पुणे जिल्हा सर्वाधिक पुढे असून 54 हजार 683 अर्जांपैकी 17 हजार 728 विद्यार्थ्यांची निवड झाली, मात्र प्रत्यक्षात 3 हजार 286 प्रवेश निश्चित झाले. नागपूर जिल्ह्यात 25 हजार 388 अर्जांपैकी 6 हजार 992 निवडी होऊन फक्त 1 हजार 289 प्रवेश झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT