एकीकडे एकजुटीने लढणार असल्याचे दावे महायुतीतील तिन्ही पक्ष करीत असताना त्यांच्यामध्ये विविध मुद्द्यांवरून तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे असल्याचे चित्र आहे.  Pudhari News Network
मुंबई

Maharashtra Politics : महायुतीत तीव्र मतभेद, धुसफूस

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : एकीकडे एकजुटीने लढणार असल्याचे दावे महायुतीतील तिन्ही पक्ष करीत असताना त्यांच्यामध्ये विविध मुद्द्यांवरून तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे असल्याचे चित्र आहे. महायुतीतील ही धुसफूस निवडणुका जवळ असताना तीव्र होऊ लागल्यामुळे घटक पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

कुठे भाजप-राष्ट्रवादी, कुठे भाजप शिवसेना तर कुठे राष्ट्रवादी-शिवसेना अशी भांडणे पाहायला मिळत असून महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे संकेत त्यामुळे जनतेत गेले आहेत.

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनाच थेट काळे झेंडे दाखविण्यापर्यंत भाजप नेत्यांनी मजल गाठली आहे. दुसरीकडे, भाजप नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते रामदास कदम यांनीच मागितल्याने महायुतीतील मतभेद रुंदावल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचवेळी महायुतीतून बाहेर पडा, असे शिंदे गटाने राष्ट्रवादीला रायगड जिल्ह्यात सुनावल्यामुळे दोन्ही पक्ष मिळून राष्ट्रवादीची कोंडी करण्याचे प्रयत्न करीत आहेत का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची जनसन्मान यात्रा सुरू आहे. त्याचवेळी लाडकी बहीण योजनेचे जाहीर कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरू आहे.

या घटनेमुळे नाराज झालेल्या पवारांनी सातारा येथे आयोजित लाडकी बहीण या सरकारी कार्यक्रमाला दांडी मारत आपली नाराजी दाखवून दिली. यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काळे झेंडे दाखविण्याची कृती चुकीची होती, असे वक्तव्य करीत भाजपच्या वतीने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

घटक पक्षानेच मागितला थेट मंत्र्यांचा राजीनामा

एकीकडे हा वाद शमत नाही तोच शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते व मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्ती रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून रवींद्र चव्हाणांचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा, अशी मागणी केली. ते कुचकामी मंत्री आहेत, अशी टीका कदम यांनी केली. सरकारचे नेतृत्व करणाऱ्या पक्षाच्या नेत्याने मंत्र्याचा राजीनामा मागितल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कदम यांच्या तोंडाला लगाम लावावा, अशी सूचना चव्हाण यांनी केली आहे.

महायुतीतून बाहेर पडा; शिंदे गटाने राष्ट्रवादीस सुनावले

शिवसेना शिंदे गटाचे कर्जत खोपोलीचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विश्वासघातकी असल्याचे म्हणत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. त्यावर थोरवे हे अदखलपात्र असून त्यांना आमचे स्थानिक नेते उत्तर देतील, असे तटकरे यांनी म्हटले आहे.

आम्हालाही ५० गोष्टी बोलता येतील : फडणवीसांनी सुनावले

रामदास कदम शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र ते वारंवार टोकाचे बोलतात, त्यामुळे आमचेही मन दुखावले जाते. मग आम्हालाही ५० गोष्टी बोलता येतील, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांना खडे बोल सुनावले असून रवींद्र चव्हाणांची पाठराखण केली आहे. रामदास कदम यांना काही आक्षेप असतील तर ते त्यांनी अंतर्गत बैठकीत मांडावेत असेही फडणवीस म्हणाले.

राष्ट्रवादीचा फडणवीसांना सवाल

जनसन्मान यात्रेत रविवारी अजित पवारांचा ताफा जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे आला असता अजित पवारांना भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. त्यांनी कार्यक्रमस्थळी निदर्शन केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी याबाबत नाराजी व्यक्त केली आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी याबाबत थेट देवेंद्र फडणवीसांकडे उत्तर मागितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT