मुंबई : अॅप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सीसाठी अॅग्रिगेटर धोरण नियमावली येत्या 2 दिवसात जाहीर होणार असून या धोरणामुळे अॅप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी चालवणार्या संस्थांवर शासनाचा अंकुश राहील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी येथे दिली.
इंडियन फेडरेशन ऑफ अॅप-बेस ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनच्या बैठकीत ते बोलत होते. मंत्रालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) किरण होळकर यांच्यासह युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते. भविष्यात अॅप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणार्या संस्थांनी व्यवसाय करताना प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवावे, भरमसाठ नफा कमविण्याच्या प्रयत्नात त्यांची आर्थिक लुबाडणूक करु नये, असे सरनाईक यांनी यावेळी बजावले.
अॅप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी सेवा पुरविणार्या संस्थांच्या संदर्भात अनेक तक्रारी प्रवासी व चालकांच्याकडून प्राप्त झाल्या असून यापैकी काही संस्था नफेखोरीच्या नादात प्रवासी व चालकांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याचे वेळोवेळी निष्पन्न झाले आहे, याकडे परिवहन मंत्र्यांनी लक्ष वेधले. त्यासाठी निश्चित नियमावली तयार करून वाजवी भाडे आकारणे तसेच चालकांना मिळणार्या उत्पन्नातील 80 टक्के परतावा देणे,अशा महत्त्वाच्या सुधारणांचा समावेश असलेले अॅग्रीगेटेड धोरण येत्या दोन दिवसात जाहीर होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याच्या हेतूने अॅग्रीगेटेड धोरणाच्या माध्यमातून अॅप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा एकाच नियमावलीच्या छताखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या व्यवसायाला निश्चित अशी दिशा प्राप्त होईल. त्यातून प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याबरोबरच चालकांच्या हक्काचे व अधिकाराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.