मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतदारांच्या बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगाने शाई तपासणीसाठी एका प्रयोगशाळेत पाठवली आहे.
आयोगाचे याबाबतच्या फॉरेन्सिक अहवालाकडे लक्ष लागले आहे. तर या शाईच्या वापराबाबत काय गौड बंगाल असेल, याकडे विरोधी पक्ष लक्ष लावून आहे.
चार ते पाच वर्षे निवडणुका न झाल्यामुळे राज्यातील सर्वच महानगरपालिकांवर प्रशासक राज होते. अखेरीस, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने एकाचवेळी 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या सर्व ठिकाणी 5 जानेवारी रोजी मतदान झाले. पण अनेक ठिकाणी मतदारांच्या बोटावरील शाई ताबडतोब पुसली जात असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या होत्या. यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्षेप घेत राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते.
यावर स्पष्टीकरण देताना राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बोटावरील मार्कर पेनची शाई पुसली जात आहे, असा संभ्रम पसरवला जात आहे. ही शाई इंडेबल इंक आहे. मात्र ती मार्कर पेनच्या स्वरूपात आहे. मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग 2011 पासून हे वापरत आहे. ही शाई पुसली जात नाही, असे स्पष्ट केले होते.
भारतात निवडणुकांमध्ये मतदारांच्या बोटावर लावण्यासाठी पारंपरिक “इंडेलिबल इंक” वापरली जाते. हे उत्पादन मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड या सरकारी कंपनीकडून निवडणुका इत्यादींसाठी बनवले जाते, पण स्थानीय महापालिका निवडणुकीत मार्कर पेन पुरवठादार कोरेस इंडिया लिमिटेड या कंपनीकडून शाई पुरवण्यात आली होती. याबाबत विरोधी पक्षांनी जोरदार हरकत घेतल्यानंतर आणि तक्रारी केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात शाई तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली आहे. मात्र, याबाबतचा फॉरेन्सिक अहवाल अद्याप आला नाही.