Cabinet Cold War
मुंबई : सध्या प्रशासकीय बदल्यांचा मौसम सुरू असून महत्त्वाच्या पदांवर नियुक्या मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. या बदल्यांवरून मंत्र्यांमध्येही शीतयुद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्र्यांनी एकमेकांच्या बदल्यांच्या फायली अडविल्याने अधिकारी हवालदिल झाले आहेत. अशावेळी मुंबईत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचे लाड करू नका. त्यांना मुंबइऐवजी आता विदर्भ आणि मराठवाड्यात रिक्त जागी पाठवा, असे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील शीतयुद्ध चर्चेत आहे. महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या दहा ते बारा अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शिफारस
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल विभागाने एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाला केली आहे, पण त्या फायली अडविण्यात आल्या आहेत. त्यात बावनकुळे यांच्या विश्वासातील काही अधिकारीही आहेत. बऱ्याच प्रयत्नांनंतर दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांना शिंदेंच्या विभागाने मान्यता दिली आहे.
मात्र, दहा अधिकारी अजूनही लटकले आहेत. त्याचवेळी शिंदेंनी महसूल विभागात बदल्यांसाठी शिफारस केलेल्या अधिकाऱ्यांच्या फायलीही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोखून धरल्याची चर्चा आहे. शीतयुद्ध महत्त्वाच्या विभागात आणि मंत्र्यांमध्ये सुरू आहे. विशेषतः गृह, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य या विभागांतही बदल्यांसाठी मंत्र्यांनी आपल्या पद्धतीने जोरदार लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. बदल्यांच्या वादामुळे मंत्री एकमेकांचे फोन घेण्याचेही सध्या टाळत असल्याच चित्र दिसत आहे.
दरम्यान, मंगळवारी बदल्यांचा मुद्द्यावर मंत्रिमंडळ बैठकीत विषय छेडला गेला असता असत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना मुंबईत नियुक्त्या देऊ नका. त्यांना विदर्भ, मराठवाड्यात पाठवा, असे आदेश मंत्र्यांना दिले. त्यामुळे अधिकाऱ्यांची कुठे सेवा झाली हे पाहून बदल्यांचे निर्णय केले जाणार असल्याचे. समजते. त्यामुळे कायम मुंबई आणि एमएमआर परिसरात नियुक्त्या मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.