मुंबई: ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने तापलेल्या राजकीय वातावरणात विधान परिषदेच्या ११ स्थानिक स्वराज्य संस्था जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे.
या निवडणुकीसाठी सरासरी ९९.०२ टक्के मतदान झाले होते. राज्यातील एकूण १७ जागांपैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले असल्याने ११ जागांसाठी गुरुवारी मतदान झाले.
सोमवारी दुपारपर्यंत सर्व जागांचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. नाशिक मतदारसंघासह सांगली-साताऱ्यातील निकालाकडे महायुतीतील संघर्षामुळे विशेष लक्ष आहे. निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच महायुतीने ६ जागा बिनविरोध जिंकून आपले पारडे जड केले आहे.
यामध्ये वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून अरुण लखाणी (भाजप), पुण्यातून विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस), ठाण्यातून रवींद्र फाटक (शिवसेना), रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस), यवतमाळ दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) आणि अहिल्यानगर प्राजक्त तनपुरे (भाजप) हे बिनविरोध विजयी झाले आहेत.
निवडणुकीतील विजयासाठी वैध मतांच्या ५० टक्के अधिक १ मत असा विजयाचा कोटा निश्चित केला जातो. पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीत जर कोणत्याही उमेदवाराने हा कोटा पूर्ण केला नाही, तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात.
यंदा भंडारा-गोंदिया मतदारसंघात मतदारांनी १०० टक्के मतदानाचा हक्क बजावला आहे, तर अमरावतीत सर्वात कमी म्हणजे ९४.६८ टक्के मतदान झाले आहे. ७ हजार ४७ एकूण मतदारांपैकी ६ हजार ९७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नाशिकमध्ये ६१९ पैकी ६१८ मतदारांनी मतदान केले असून, सर्व मते वैध ठरल्यास विजयासाठी ३१० मतांचा कोटा आवश्यक ठरेल.
कुठे किती मतदान?
१. भंडारा-गोंदिया : १००%
२. सांगली-सातारा : ९९.८९%
३. नाशिक : ९९.८४%
४. परभणी-हिंगोली : ९९.७९%
५. नांदेड : ९९.७८%
६. सोलापूर : ९९.६८%
७. धाराशिव-लातूर-बीड : ९९.४९%
८. संभाजीनगर-जालना : ९८.९०%
९. नागपूर : ९८.४४%
१०. जळगाव : ९७.७८%
११. अमरावती : ९४.६८%