मुंबई: विधि शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची मुदत ११ ऑगस्ट रोजी संपत असतानाच, पाच वर्षांच्या विधि अभ्यासक्रमातील ६०, तर तीन वर्षांच्या अभ्यासक्रमातील ७२ महाविद्यालये अजूनही प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर आहेत.
बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यतेच्या नव्या निकषांमुळे उपलब्ध महाविद्यालयांची संख्या पहिल्या फेरीत अजूनही कमी आहे. पसंतीक्रमाला कमी प्रतिसाद मिळत असल्याने शनिवारी दोन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यंदापासून प्रत्येक विधि महाविद्यालयासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्णवेळ प्राचार्य, आवश्यक पात्रतेचे प्राध्यापक, अभिरूप न्यायालय (मूट कोर्ट), ग्रंथालय, वर्गखोल्या व इतर पायाभूत सुविधांचे निकष पूर्ण केल्यानंतर बार कौन्सिल संबंधित महाविद्यालयाला मान्यता देते.
या निकषांची पूर्तता न झालेल्या किंवा मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांचा यंदाच्या प्रवेश फेरीत समावेश केलेला नाही. यामुळे महाविद्यालयांची संख्या दुसऱ्या फेरीत वाढण्याची शक्यता आहे.
‘बेटरमेंट’चा पर्याय उपलब्ध ...
विधि प्रवेश प्रक्रियेत ईटी सेलने ‘ऑटो फ्रीझ’ची पद्धत रद्द करून ‘बेटरमेंट’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. बीसीआयची मान्यता व विद्यापीठांची संलग्नता उशिरा मिळाल्याने पहिल्या पसंतीक्रमात अनेक महाविद्यालयांचा समावेश करता आला नव्हता.
त्यामुळे नव्याने समाविष्ट झालेल्या महाविद्यालयांचा विचार करून ऑप्शन फॉर्म ‘अनब्लॉक’ करून पसंतीक्रमात बदलण्याची संधी देण्यात आली आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या कॅप फेरीत जागा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरून ‘फ्रीझ’ करून प्रवेश निश्चित करता येईल.
१३ हजार ४४१ जागा उपलब्ध
रविवारपर्यंत ६ हजार ६८९ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम लॉक केले आहेत. यंदा प्रवेश प्रक्रियेतील १४६ महाविद्यालयात १३ हजार ४४१ जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी तीन वर्षांच्या विधि अभ्यासक्रमासाठी २१८ महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाली होती. त्यामुळे यंदा ७२ महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेपासून दूर आहेत.
१८ हजार ३५७ अर्ज
पाच वर्षांच्या विधि अभ्यासक्रमासाठी रविवार सायंकाळपर्यंत २० हजार ४६३ विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली आहे. त्यापैकी १८ हजार ३५७ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले असून, १७ हजार ३०६ अर्जांची पडताळणी झाली आहे.
मात्र, आतापर्यंत केवळ ३ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम लॉक केले आहेत. सध्या प्रवेश प्रक्रियेत १०१ महाविद्यालये सहभागी असून, त्यामध्ये एकूण ७ हजार ७५५ जागा उपलब्ध आहेत.
गेल्या वर्षी ही संख्या १६१ होती. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेपासून दूर आहेत. तीन वर्षांच्या विधि अभ्यासक्रमासाठी ५४ हजार १०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ४८ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले असून, ४२ हजार ५८ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे.