

मुंबई: मुंबईकरांसाठी डासांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांत डेंग्यूने मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अक्षरशः उच्चांक गाठला असून, २०१५ ते २०२२ या आठ वर्षांत मुंबईत नोंदलेल्या डेंग्यू रुग्णांच्या तुलनेत २०२३ ते २०२५ या अवघ्या तीन वर्षांत तब्बल १७ हजार ३६८ रुग्णांची नोंद झाली आहे.
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये मुंबईत १ हजार १२९ डेंग्यू रुग्ण होते. २०१६ मध्ये ही संख्या १ हजार ६८० आणि २०१७ मध्ये १ हजार २३४ झाली. २०१८ मध्ये १ हजार २, तर २०१९ मध्ये ११९ रुग्णांची नोंद झाली.
कोविड काळातील २०२० मध्ये डेंग्यू रुग्णसंख्या १२९ वर आली होती. २०२१ मध्ये १ हजार २२४, तर २०२२ मध्ये २ हजार ८५६ रुग्ण आढळले. त्यानंतर डेंग्यूने पुन्हा जोर धरला. २०२३ मध्ये तब्बल ५ हजार ४६८ रुग्णांची नोंद झाली. २०२४ मध्ये ही संख्या वाढून ५ हजार ९९०, तर २०२५ मध्ये ५ हजार ९१० वर पोहोचली. म्हणजेच २०२३ ते २०२५ या तीन वर्षांत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत तब्बल १७ हजार ३६८ इतकी भर पडली आहे.
पावसाळ्याचे आणखी काही महिने बाकी असल्याने डेंग्यूचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याबरोबरच महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.
चिकन गुनियानेही घेतली उचल
२०१५ ते २०२० या सहा वर्षांत मुंबईत चिकन गुनियाचा एकही रुग्ण नोंदला नव्हता. २०२२ मध्ये ८०, २०२३ मध्ये २५०, २०२४ मध्ये ६९२ आणि २०२५ मध्ये ४८३ रुग्णांची नोंद झाली.
लेप्टोस्पायरोसचाही उद्रेक
लेप्टोस्पायरोसचे २०१५ मध्ये १९६, २०१६ मध्ये २६७, २०१७ मध्ये २३९, २०१८ मध्ये २२८, २०१९ मध्ये २८२, २०२० मध्ये २४०, २०२१ मध्ये २२४ व २०२२ मध्ये २८६ रुग्णांची नोंद झाली. २०२३ मध्ये हा आकडा झपाट्याने वाढून १ हजार २६३ वर पोहोचला. त्यानंतर २०२४ मध्ये ९९०, २०२५ मध्ये ७५०, तर २०२६ मध्ये १४६ रुग्णांची नोंद झाली आहे.