मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अनुषंगाने राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू असताना तिसरी, चौथी आणि सहावीच्या विषयनिहाय तासिका विभागणीबाबत अद्याप कोणताही अधिकृत आदेश प्रसिद्ध न झाल्याने राज्यभरातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक संभ्रमात सापडले आहेत. शाळा सुरू होण्यास तीन दिवस शिल्लक असतानाही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) याबाबत स्पष्टता न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण यांचे मसुदे तयार करण्यात आले आहेत. शासनाने अभ्यासक्रम अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रमही जाहीर केला आहे. मात्र, शालेय स्तरावरील राज्य अभ्यासक्रम आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्याची अथवा अंतिम आराखडा प्रसिद्ध झाल्याची घोषणा अद्याप केली नाही. अशा परिस्थितीत अध्यापनाच्या नियोजनासाठी आवश्यक तासिका विभागणीच जाहीर न झाल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत.
गेल्या शैक्षणिक वर्षात पहिलीसाठी नवीन पाठ्यपुस्तकांसह विषयनिहाय तासिका विभागणी प्रसिद्ध करण्यात आली होती. यंदा दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवीन पाठ्यपुस्तके लागू होत आहेत. त्यापैकी दुसरीच्या तासिका गतवर्षीच्या आदेशामुळे स्पष्ट आहेत. मात्र तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन मार्गदर्शक आदेश प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत. परिणामी २०१७ मधील आदेशांनुसार शाळांना नियोजन करावे लागत आहे.
शालेय वेळापत्रक तयार करणे ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया मानली जाते. उपलब्ध शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रता, विषयवार तासिका, इयत्ता व तुकड्यांचे वाटप यांचा विचार करून संपूर्ण शाळेचे एकत्रित वेळापत्रक तयार करावे लागते. त्यानंतर प्रत्येक वर्ग व शिक्षकासाठी स्वतंत्र वेळापत्रक निश्चित केले जाते. या प्रक्रियेस दहा ते पंधरा दिवस लागतात. मात्र तासिका विभागणीचे आदेशच नसल्याने अनेक शाळांमध्ये वेळापत्रक नियोजन रखडल्याची स्थिती आहे.
राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या नुकत्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे झालेल्या वार्षिक कार्यशाळेतही या विषयावर सविस्तर चर्चा झाली. मात्र अधिकृत आदेश उपलब्ध नसल्याने कोणतीही ठोस दिशा देता आली नाही. राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी या विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.