मुंबई: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे राज्यातील काही भागांमध्ये पेट्रोल, डिझेलसाठी पंपांच्या बाहेर लांब रांगा लागत असताना, राज्यात महिनाभर पुरेल इतका इंधनसाठा आहे, असा दावा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
राज्यातील काही पेट्रोलपंपांवर इंधनाचा पुरवठा पोहोचण्यास वेळ लागत असेल. पण, पेट्रोल, डिझेल मिळतच नाही, अशी तक्रार अद्याप आली नाही. जर तक्रार आली तर त्यावर कारवाई करण्यात येईल.
पेट्रोल, डिझेलची कमतरता हा जागतिक परिणाम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपण आभार मानायला हवेत. कारण या अगोदर 27 देशांकडून आपण कच्चे तेल घेत होतो, पण आता अधिक देशांकडून कच्चे तेल आणि इतर गोष्टी घेतल्या जात आहेत, असेही भुजबळ म्हणाले.
शेतकऱ्यांना मिळणार सव्वातीन हजार कोटींची थकबाकी
दरम्यान, धान आणि मका उत्पादक शेतकऱ्यांचे चुकाऱ्यापोटीचे 3 हजार 214 कोटींची थकबाकी तातडीने द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे अखेरीस हा प्रश्न मार्गी लागला.
भुजबळ म्हणाले, धान आणि मका विक्रीचे हजारो कोटी रुपये अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. यामुळे राज्यभरातील आमदारांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. शेतकऱ्यांना आधी पैसे द्यायचे आणि नंतर केंद्र सरकारकडून ती रक्कम परत मिळवायची, असे धोरण आहे. पण फाईल्स एका टेबलवरून दुसऱ्यावर फिरत होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांना आपण याबाबत माहिती दिली असता, फडणवीस यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करत प्रकरण मार्गी लावण्याचे आदेश दिले, अशी माहिती मंत्री भुजबळ यांनी दिली.