मुंबई: राज्यातील अमली पदार्थांचे जाळे उखडून टाकण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
या युनिटमधील अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल. तसेच ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार ड्रग्ज सापडेल, तिथल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
अमली पदार्थाच्या कोणत्याही घटनांमध्ये पोलिसांचा सहभाग आढळून आल्यास बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. ठाकरे शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी मुंबईतील अमली पदार्थ सेवन आणि विक्रीबाबत मंगळवारी प्रश्न उपस्थित केला होता.
जयंत पाटील यांनी ऑनलाईन ड्रग्ज पुरवठा आणि इंजेक्शनद्वारे ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांचा मुद्दा उपस्थित करत, बंदरांवर पाळत ठेवण्याची आणि ड्रग्ज रॅकेटमध्ये सामील असलेल्या पोलिसांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी जानेवारी ते एप्रिल २०२६ दरम्यान राज्यात ड्रग्जप्रकरणी १ हजार १४२ गुन्हे दाखल झाले असून १ हजार ६२६ आरोपींना अटक करण्यात आली. तर ड्रग्ज सेवन करणाऱ्यांविरुद्ध ३ हजार १९९ गुन्हे नोंदवले गेले आहेत. आता केवळ ड्रग्ज साठ्यापुरती कारवाई न करता त्याचे सर्व दुवे शोधले जात आहेत.
आग्रीपाड्यात प्रयोगशाळा शोधून ५० कोटींचे मॅफेड्रोन जप्त केले, तर साकीनाका येथील तस्करीवरून गुजरातच्या कारखान्यावर धाड टाकून ७४ कोटींचा माल जप्त करण्यात आला. ड्रग्ज तस्करांशी हितसंबंध आढळलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. २०२५ मध्ये ५२३.१७ कोटींचे ड्रग्ज नष्ट करण्यात आले.
पुनवर्सन केंद्रासाठी महापालिकांना आदेश
अमली पदार्थविरोधी मोहिमे दरम्यान राज्यात पुनर्वसन केंद्र उभारण्याची गरज असल्याची मागणी अमीन पटेल यांनी केली. त्यानुसार राज्यात जास्तीत जास्त पुनवर्सन केंद्र उभारली जातील, तर यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व महापालिकांना आदेश देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
१५ विभागांच्या माध्यमातून कारवाई
अमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरवशावर जिंकता येणार नाही. म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण १५ विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे.
साताऱ्यातील ‘ती’ फॅक्टरी सलीम डोला याची
साताऱ्यात काही दिवसांपूर्वी सापडलेली अमली पदार्थांची फॅक्टरी नेमकी कुणाची, यावरून विरोधी पक्षातील आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, देशातील ड्रग्ज रॅकेटचा सर्वात मोठा सूत्रधार 'सलीम डोला' याला आपण रेड कॉर्नर नोटीस काढून नुकतीच अटक करून भारतात आणले आहे.
मुंबई पोलिसांनी अत्यंत कौशल्याने त्याला आणि त्याच्या १२ हस्तकांना बेड्या ठोकल्या. या एकाच व्यक्तीने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये एमडीचे कारखाने उभे करून तब्बल ४ हजार किलो एमडीची निर्मिती आणि विक्री केली होती, ज्यातील बहुतांश साठा आपण हस्तगत केला आहे. साताऱ्यातील ती फॅक्टरीही आपलीच असल्याचे त्याने चौकशीत मान्य केले असून, ड्रग्ज रॅकेट मोडण्यात पोलिसांना हे मोठे यश मिळाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.