मुंबई: राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून आत्तापर्यंत सुमारे १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. परंतु, यापैकी केवळ ३ लाख ३३ हजार शेतकऱ्यांनीच इ केवायसी केली असून त्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी इ केवायसी केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.
राज्यातील महायुती सरकारने सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना अंदाजे ३६ हजार कोटींची कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनी लाभार्थी ५३३ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करत या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. आणखी १६ लाख ९६ हजार २०१ जणांची यादी जाहीर करण्यात आली.
मात्र, कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी इ केवायसी सक्तीची करण्यात आली असून आतापर्यंत केवळ ३ लाख ३३ हजार ८६७ शेतकऱ्यांनीच इ केवायसी केल्याने या कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी रखडणार आहे.
१६ लाख ९६ हजार २०१ पात्र शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही. लाडकी बहीण योजना जाहीर करताना २ कोटी ५२ लाख महिलांना लाभ मिळेल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, नंतर इ केवायसी बंधनकारक करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात महिला लाभार्थी संख्या घटली. पडताळणीनंतर १ कोटी ६६ लाख महिलांना हा लाभ मिळत आहे.