मुंबई: अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या नियमित फेरीसाठी राज्यभरातील ६ लाख ८० हजार ७८६ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम निश्चित करून अर्ज लॉक केले असून, या विद्यार्थ्यांची महाविद्यालय वाटप यादी १३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई विभागातून सर्वाधिक १ लाख ७३ हजार २२३ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ हजार ६४९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यभरातून १३ लाख ६८ हजार ७७५ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीसाठी ६ जूनपासून विद्यार्थी नोंदणी, प्रवेश अर्जाच्या भाग-१मधील दुरुस्ती तसेच भाग-२मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
ही मुदत ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता संपली असून राज्यातील ६ लाख ८० हजार ७८६ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम निश्चित करून अर्ज लॉक केले आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमानुसार आणि उपलब्ध जागांनुसार महाविद्यालय वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, १३ जून रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर केली जाणार आहे.
मुंबई विभागात अकरावीसाठी एकूण ४ लाख ७७ हजार २९० जागा उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीअखेर २ लाख १२ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख ३३ हजार ३२३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली; मात्र प्रत्यक्षात ७६ हजार २१४ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला. अजूनही ४ लाख १ हजार ७६ जागा रिक्त आहेत.
१३ जून रोजी अलॉटमेंट यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून शुल्क भरत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. प्रवेश निश्चितीची प्रक्रिया १६ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर १८ जून रोजी तिसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, तर १९ जून रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.