मुंबई: राज्यात 1 मे महाराष्ट्र दिनापासून रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाने अमराठी चालकांना ‘व्यवहारिक मराठी’ शिकविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या संक्षिप्त मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
राज्य सरकारने राज्यात ऑटो व टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी भाषा अनिवार्य केली आहे. त्यांना प्रवाशांशी मराठीतून संवाद साधने सक्तीचे राहणार आहे. 1 मे पासून 15 ऑगस्ट या कालावधीत त्यासाठी तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
मात्र, मराठी येत नाही म्हणून लगेच कारवाई केली जाणार नसली तरी अमराठी वाहन चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकावी लागणार आहे. त्यासाठी ही पुस्तिका विशेषतः रिक्षा, टॅक्सी तसेच ओला आणि उबर या सारख्या प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनचालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या सोप्या व आवश्यक मराठी वाक्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला असून, प्रवाशांशी सुसंवाद साधताना भाषेची अडचण येऊ नये आणि सेवा अधिक सुलभ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
स्थानिक भाषेचे ज्ञान अत्यंत आवश्यक
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सेवा देताना स्थानिक भाषेचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. व्यवहारिक मराठीच्या माध्यमातून चालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल आणि सेवेत गुणात्मक सुधारणा घडेल, असा विश्वास व्यक्त केला.
परिवहन विभागाच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, पुढील काळात राज्यभर अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही पुढाकार घेऊन मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.