राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २० सप्टेंबरपासून लागू होण्याची शक्यता.
राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २० सप्टेंबरपासून लागू होण्याची शक्यता. PTI
मुंबई

Maharashtra Assembly Elections | राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये?

दीपक दि. भांदिगरे

राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २० सप्टेंबरपासून लागू होईल आणि ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदान होईल, अशी शक्यता निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बहुधा, राज्यातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होईल, असे सांगण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त द टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

विधानसभा निवडणुकीबाबत अधिकारी काय म्हणाले?

  • विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २० सप्टेंबरपासून लागू होईल.

  • ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदान शक्य.

  • २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार.

  • मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची सूचना. 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, २०१९ मध्ये २७ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. तर २१ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते. तर २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता.” आता आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहोत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, अंतिम मतदार यादी २० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.” असेही अधिकाऱ्याने पुढे म्हटले.

निवडणूक आयोगाने २० जून रोजी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू आणि काश्मीरमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना १ जून २०२४ ही पात्र तारीख म्हणून फोटो मतदार यादीचा विशेष आढावा घेण्यास सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने दिल्या महत्त्वाच्या सूचना

निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २४ जून २०२४ पूर्वी मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, छायाचित्रांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे आणि चांगल्या दर्जाच्या छायाचित्रांची खात्री करण्याबाबत विचारणा केली आहे. तसेच त्यांना २५ जून पूर्वी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी एक विशेष मोहीम असेल आणि २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

सर्व नोंदणीकृत कुटुंब सदस्य एकाच विभागात

सर्व नोंदणीकृत कुटुंब सदस्य एकाच विभागात आणि त्याच ठिकाणी राहतील. तळमजल्यावरच मतदान केंद्रे असतील आणि मतदारांना दोन किमीपेक्षा जास्त प्रवास करण्याची गरज भासणार नाही, असेही निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.

राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला

लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, ”महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल आणि आम्ही स्पष्ट बहुमत मिळवू” असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

SCROLL FOR NEXT