पवन होन्याळकर
मुंबई: पहिली ते पाचवी किंवा सातवीच्या प्राथमिक वर्गांना एकाच शिक्षकाने सर्व विषय शिकवण्याची प्रशासकीय चौकट अनेक दशकांपासून चालत आली असली, तरी बदलती संचमान्यता आणि शाळांच्या वर्गवारीनुसार भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे अशा विविध विषयांचे अध्यापन एकाच शिक्षकाला करावे लागत आहे. राज्यातील एकूण ७ लाख ४६ हजार ३७७ शिक्षकांपैकी २ लाख ४७ हजार १२७ (३३.११ टक्के) शिक्षक ‘ऑल इन वन’ म्हणून काम करत आहेत.
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडे असलेल्या आकडेवारीतून विषयनिहाय शिक्षकांची माहिती समोर आली आहे. राज्यात पहिली ते बारावीपर्यंत एकूण १ लाख ८ हजार ९५ शाळा असून, यामध्ये २ कोटी १५ लाख ३२ हजार ३८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या अवाढव्य पटसंख्येसाठी ७ लाख ४६ हजार ३७७ शिक्षक राज्यात कार्यरत आहेत. या शिक्षकांपैकी तब्बल २ लाख ४७ हजार १२७ सर्व विषय शिकवण्यासाठी अव्वल स्थानी आहेत त्यानंतर स्वतंत्र विषयांमध्ये इंग्रजी शिकवणारे ८१ हजार ७१६, तर गणिताचे ७९ हजार ८०२, विज्ञानासाठी ५८ हजार ५१ आणि हिंदीसाठी ४३ हजार ७३१ शिक्षक आहेत.
तर दुसरीकडे एकूण शिक्षकांच्या आकडेवारीत पुणे जिल्ह्यात ७८ हजार ३३ शिक्षक सर्वाधिक आहेत तर त्यापाठोपाठ ठाणे (५०,४१५), नाशिक (४०,६५७), मुंबई (३७,७६६), नागपूर (३२,८००), छत्रपती संभाजीनगर (३२,१७९) आणि अहिल्यानगर (३०,९९५) इतके शिक्षक अहेत. सर्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी अवघे ५ हजार ७०१ शिक्षक कार्यरत आहेत.
तर विदर्भातील भंडारा (६,७००), गडचिरोली (७,८५२), वर्धा (७,९८६) आणि मराठवाड्यातील हिंगोली (८,२२६) या जिल्ह्यांमध्ये शिक्षकसंख्या दहा हजारांपेक्षा कमी आहेत. या जिल्ह्यांमध्येही 'सर्व विषय' शिकवणाऱ्या शिक्षकांचा भार सर्वाधिक आहे; यात पुणे (२१,२९५), नाशिक (१५,२३५), ठाणे (१२,६५६), अहिल्यानगर (१२,०६१) आणि सोलापूर (११,४८८) या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दहा हजारांहून अधिक आहेत.
इंग्रजी-हिंदीच्या तुलनेत माय मराठीची उपेक्षा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याचा उत्सव साजरा केला जात असताना, प्रत्यक्ष शाळांमध्ये मात्र ‘माय मराठी’ शिकवण्यासाठी स्वतंत्र शिक्षकांची संख्या कमी आहे. इंग्रजी शिकवणारे ८१ हजार ७१६ आणि हिंदीसाठी ४३ हजार ७३१ शिक्षक कार्यरत असताना, राजभाषा मराठी शिकवण्यासाठी स्वतंत्रपणे नियुक्त शिक्षकांची संख्या अवघी ११ हजार ३३७ ( १.५२ टक्के) इतकी नगण्य आहे.
माध्यमिक स्तरावरही ओढाताण
‘ऑल इन वन’चा ताण आता केवळ प्राथमिकपुरता मर्यादित राहिलेला नसून माध्यमिक स्तरावरही पसरत आहे. प्राथमिक स्तरावर विषयानुसार नव्हे, तर विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक दिले जातात.
यामध्ये माध्यमिकमध्ये ६० टक्के कला पदवीधर (भाषा व समाजशास्त्र -५ पैकी ३ शिक्षक) आणि ४० टक्के विज्ञान पदवीधर (गणित व विज्ञान -५ पैकी २ शिक्षक) असा तासिकांच्या विभागणीचा आकृतीबंध ठरलेला आहे. मात्र, संचमान्यतेतील जाचक अटींमुळे अनेक शिक्षकांची मंजूर पदे कमी झाली तर सेवानिवृत्त शिक्षकांच्या रिक्त जागांवर भरती न झाल्याने बहुतांश शिक्षकावर इतर विषय शिकवावे लागत आहे.
प्राथमिक स्तरावर डीएड शिक्षकाकडून सर्व विषय शिकवण्याची अपेक्षा स्वाभाविक असली, तरी माध्यमिकसाठी असा निश्चित आकृतीबंध व तासिका विभाजन आहे. मात्र, संचमान्यतेतील त्रुटी आणि मंजूर पदे कमी झाल्यामुळे माध्यमिक शाळांतही शिक्षकांवर स्वतःचा विषय नसताना इतर विषय शिकवण्याची वेळ आली आहे. पवित्र पोर्टल मधून वर्षातून दोनदा भरती करण्याचे आदेश असताना गेल्या ६-७ वर्षांत केवळ तीनदा भरती झाली. ही उदासीनता विद्यार्थ्यांच्या पायाभूत गुणवत्तेवर गदा आणणारी आहे.-महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळ