मुंबई: राज्यातील कृषी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर झाली असून, यामध्ये ७ हजार ३२८ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यापैकी २ हजार ५३४ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमातील पहिले महाविद्यालय मिळाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा प्रवेश ‘ऑटो फ्रीझ’ झाला असून, त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे कृषी विद्यापीठांमधील नऊ पदवी अभ्यासक्रमांची ही प्रवेशफेरी घेण्यात आली.
यामध्ये बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, बी.एफ.एस्सी. मत्स्य विज्ञान, बी.टेक. कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान, जैवतंत्रज्ञान तसेच कृषी व्यवसाय व्यवस्थापन या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
विद्यापीठनिहाय विचार करता राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व त्याअंतर्गत महाविद्यालयांना सर्वाधिक २ हजार ९२६ जागांचे वाटप झाले आहे.
त्यानंतर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला २ हजार ६१, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला १ हजार ८०४, तर दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाला ५३७ जागा मिळाल्या आहेत.
तिसऱ्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी १ ते ३ सप्टेंबरदरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे.
तसेच पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत प्रवेशाचे वाटप निश्चित झालेल्या उमेदवारांना १ ते ४ सप्टेंबरदरम्यान संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून मूळ कागदपत्रे सादर करणे आणि आवश्यक शुल्क भरणे बंधनकारक आहे.
असे आहे जागावाटप
बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी - ५,२७६
बी.टेक. अन्न तंत्रज्ञान - ५३४
बी.एस्सी. (ऑनर्स) उद्यानविद्या - ४४५
बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन - ४१५
बी.टेक. जैवतंत्रज्ञान - ३१७
बी.टेक. कृषी अभियांत्रिकी - २६१
बी.एस्सी. (ऑनर्स) वनविद्या - ४५
बी.एस्सी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान - १८
बी.एफ.एस्सी. मत्स्य विज्ञान - १७