10 Crore Tree Campaign
मुंबई : राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत यावर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड करणार असल्याची घोषणा नुकतीच केली होती. पुढील वर्षीही दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट असून वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार महसूल व वन विभागाने शासन निर्णय जारी करत 10 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे.
वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने 10 टक्के अधिक वृक्ष लागवडीचे नियोजन विचारात घेऊन विभाग व प्राधिकरणनिहाय वृक्ष लागवडीचे वाटप करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामाकरीता पुरेशी रोपे उपलब्ध नसल्याने रोपे उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही. त्यामुळे शासन नियमानुसार रोपे खरेदी करुन वृक्ष लागवडीचे विभागाचे उद्दीष्ट पूर्ण करावे. तसेच वृक्षारोपण प्रामुख्याने त्या त्या भागांमधील भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन, त्या भागात वाढ होऊ शकणार्या स्थानिक प्रजातींची प्राधान्याने लागवड करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
रेशीम लागवड (वस्त्रोद्योग विभाग) 4 कोटी, वन विभाग (एफडीसीएम, बांबु बोर्डसह) 2 कोटी, कृषी-फलोत्पादन विभाग 1 कोटी, ग्रामविकास विभाग 1 कोटी, नगरविकास विभाग 1 कोटी, शालेय शिक्षण विभाग 20 लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग 15 लाख, जलसंपदा विभाग 5 लाख, महसुल विभाग 5 लाख, उद्योग विभाग 5 लाख, गृह विभाग 5 लाख, उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग 5 लाख, मृद व जलसंधारण विभाग 5 5 लाख, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग 4 लाख, सार्वजनिक आरोग्य विभाग 3 लाख, उर्जा विभाग 3 लाख, आदिवासी विकास विभाग 3 लाख, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभाग 2 लाख, महिला आणि बाल कल्याण विभाग 2 लाख, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग 2 लाख, पर्यटन विभाग 1 लाख, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ 20 लाख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 20 लाख, रेल्वे विभाग 20 लाख, संरक्षण (डिफेन्स) विभाग 5 लाख, एक पेड मी के नाम 2.0 50 लाख.