मुंबई : राजकीय क्षेत्रातील ओपिनियन पोल आणि निवडणुकीचे अंदाज वर्तविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लोक पोल या संस्थेने केलेल्या ताज्या सर्वेक्षणात राज्यात सत्तांतराचे भाकीत वर्तविले असून, महाविकास आघाडीचे सरकार येण्याचा अंदाज वर्तविला आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल असे संकेतही या सर्वेक्षणाने दिले आहेत. महाविकास आघाडीला 141-154 (41 ते 44 टक्के मते) तर विद्यमान सत्ताधारी महायुतीला 115 ते 128 जागा (38 ते 41 टक्के मते) मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणात वर्तविण्यात आली आहे. छोटे पक्ष, अपक्ष यांच्यासह इतरांना 5 ते 18 जागा (15 ते 18 टक्के मते) मिळतील, असेही हे सर्वेेक्षण म्हणते. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी किमान 145 आमदारांची गरज असते. महाविकास आघाडी हा आकडा गाठेल, असा या सर्वेक्षणाचा स्पष्ट अंदाज आहे.
लोक पोलने जागांच्या व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाविकास आघाडीची विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईत सर्वोत्तम कामगिरी राहील. विदर्भातील 62 पैकी 40 ते 45 जागांवर मविआ विजयी होईल. मराठवाड्यात 46 पैकी 25 ते 30 तर मुंबईत 36 पैकी 20 ते 25 जागांवर मविआच्या विजयाचे भाकीत या सर्वेक्षणात वर्तविण्यात आले आहे.
या सर्वेक्षणानुसार खान्देशात 47 जागा असून महायुती आणि मविआ या दोघांनाही जवळपास सारख्याच जागा मिळतील. पश्चिम महाराष्ट्रात 58 जागा असून त्यापैकी 30 ते 35 जागांवर मविआ तर 20 ते 25 जागांवर महायुती विजयी होण्याची शक्यता आहे. लोक पोलच्या सर्वेेक्षणानुसार ठाणे-कोकणात मात्र महायुतीची सर्वोत्तम कामगिरी राहील. ठाणे-कोकणातील 39 पैकी 25 ते 30 जागांवर महायुतीला विजय मिळण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत मविआ केवळ 5 ते 10 च जागा जिंकू शकेल.
लोकपोल या संस्थेने तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच काँग्रेस सत्तेत येत असल्याचे भाकीत वर्तविले होते. तेलंगणात पुन्हा एकदा बीआरएस पक्षाची सत्ता येईल, अशी चर्चा असताना लोकपोलच्या सर्वेक्षणाबद्दल तेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष निकालानंतर लोक पोलचे जागांविषयक अंदाज जवळपास बरोबर ठरले. कर्नाटकातही लोक पोलने काँग्रेस सत्तेत येत असल्याचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाजही खरा ठरला होता.