कुर्ला : दोन वर्षांपासून कुर्ला ते चेंबूर दरम्यान मेट्रो 2बी चे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यात आता काही महिन्यांपासून याच मार्गावर पालिकेकडून मल:निस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने या समस्येत भर पडली आहे. दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा तास लागत असून ही परवड प्रवाशांना नकोशी झाली आहे.
कोरोना लॉकडाऊन दरम्यान कुर्ला- चेंबूर मार्गावरील मेट्रो 2 बी चे काम सुरू झाले आहे. तेव्हापासून हे काम रडतखडत सुरू आहे. आता नेहरूनगर येथील पिलरचे काम शिल्लक आहे. तर चेंबूरच्या स्वस्तिक पार्कपर्यंत मेट्रोच्या पिलरचे काम पूर्ण झालेले आहे. या कामामुळे अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी आणि फेरीवाल्यांचे बस्तान यामुळे गेली दोन वर्षे प्रवासी गैरसोय सहन करीत आहेत.
दररोज वाहतूक कोंडी होत आहे. पिलरचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार अशी आशा येथील नागरिकांना होती. मात्र काही महिन्यांपासून पालिकेने याच मार्गावर मल:निस्सारण वाहिनी टाकण्यासाठी जागोजागी खोदकाम केले आहे. या खोदकामाच्या बाजूला पत्रे लावून रस्ता अडवल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट झाली आहे.
कुर्ला रेल्वे स्थानक परिसर आणि नेहरूनगर येथे आशा प्रकारे पत्र लावून रस्ता अडवण्यात आला आहे. सायंकाळच्या सुमारास तर कुर्ल्याच्या नेहरूनगर ते ठक्कर बाप्पा कॉलनी परिसरात अनेक फेरीवाल्यांच्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या राहतात. परिणामी रात्री 11 वाजेपर्यंत मोठी कोंडी असते. त्यामुळे फेरीवाल्यांना या मार्गावरून हटवावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनी येथील रस्ता कुर्ला उड्डाणपुलापर्यंत बंद केला आहे. वाहनांना वत्सलाताई नगरला वळसा घालून जावे लागत आहे.
नेहरुनगर परिसरात पूर्वी बोटावर मोजण्याइतकेच फेरीवाले होते. मात्र गेल्या काही वर्षांत फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांनी संपूर्ण रस्तावर त्यांची दुकाने मांडल्याने आम्हाला चालण्यासाठी देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे.राजाराम कांबळे, स्थानिक रहिवासी
पूर्वी चेंबूर ते कुर्ला हे अंतर दहा मिनिटांत पार करता येत होते. मात्र या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो व विकस कामांमुळे मोठी केंडी होत आहे. वेळेवर पोहचताच येत नाही.सतीश गाडे, वाहनचालक