मुंबई: माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाण्यामुळे हक्कभंग समितीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने आपण कोणतीही चूक केलेली नसल्याचे सांगितले आहे. आपण सादर केलेले सादरीकरण हे कॉमेडीच्या स्वरूपातील असून, तो व्यवसाय असल्याचे कामरा यांनी स्पष्ट केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावरील ‘ठाणे की रीक्षा’ या गाण्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला असून गुरूवारी विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर साक्ष नोंदविण्यात आली. विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली.
हक्कभंग आणणारे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेले आरोप त्यांना वाचून दाखवले. यावेळी समितीचे अध्यक्ष म्हणून प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आपण कोणतीही चूक केली नसल्याचे कामरा याने ठामपणे सांगितले.
यासंदर्भात प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. समितीसमोर आलेल्या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीवर द्वेषभावनेतून कारवाई केली जाणार नाही. प्रत्येक प्रकरणाचा पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने विचार करून निर्णय घेतला जाईल. कुमार कामरा यांनाही दिलगिरी व्यक्त करण्याची संधी देण्यात आली असून, ते माफीनामा देतात की नाही, यावर पुढील निर्णय अवलंबून असेल, असे लाड यांनी सांगितले.
दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे याच्यावरही याच प्रकरणात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. परंतु, त्या आजारी असल्याचे त्यांनी कळवले असून त्यांच्या सुनावणीची तारीख त्यानुसार ठरवली जाणार असल्याचे लाड यांनी सांगितले.