Actor Kishor Kadam On Andheri Redevelopment Project
मुंबई: प्रसिद्ध अभिनेते आणि कवी सौमित्र म्हणून ओळखले जाणारे किशोर कदम यांनी आपल्या अंधेरीतील राहत्या सोसायटीत सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या (Redevelopment) प्रक्रियेत मोठा घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. बिल्डर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (PMC) आणि सोसायटी कमिटीने संगनमताने या सोसायटीतील सभासदांची फसवणूक करून त्यांची इमारत चक्क SRA/स्लम योजनेअंतर्गत विकसित करण्याचा घाट घातला आहे. या अन्यायाविरोधात त्यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील जनतेला मदतीचे भावनिक आवाहन केले आहे.
‘अंधेरी हवा महल‘ या सोसायटीतील सभासदांची दिशाभूल
किशोर कदम हे अंधेरी पूर्व येथील चाकाला परिसरातील ‘अंधेरी हवा महल’ या सोसायटीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यांच्या सोसायटीमध्ये पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू असून, यात मोठी फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कदम यांच्या मते, सोसायटी कमिटीने बिल्डर आणि पीएमसीच्या दबावाखाली येऊन सभासदांची दिशाभूल केली आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली ही इमारत DCPR 33(11) आणि 33(12)B या नियमांनुसार, म्हणजेच SRA (झोपडपट्टी पुनर्वसन) योजनेअंतर्गत विकसित केली जात असल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे.
कदम यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, "कमिटी चौकस नसेल आणि बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल, तर सामान्य माणसांची राहती घरे एखाद्या ट्रान्झिट कॅम्पसारखी होण्याची भीती असते. आमच्या सोसायटीत मूर्खांच्या बहुमताचा गैरफायदा घेतला जात आहे."
"मी महाराष्ट्रातल्या तमाम रसिक जनतेला एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन करीत आहे," या शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. किशोर कदम यांच्या या आवाहनामुळे मुंबईतील पुनर्विकासाच्या प्रक्रियेत सामान्य माणसाची होणारी ससेहोलपट पुन्हा एकदा समोर आली आहे.
महत्वाची कागदपत्रे लपवली
या प्रक्रियेतील त्रुटींवर कायद्याच्या चौकटीत राहून प्रश्न विचारल्यामुळे आपल्याला जाणूनबुजून लक्ष्य केले जात असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. त्यांच्यासोबत इतर २३ सभासदांची घरेही धोक्यात आली आहेत. त्यांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचताना काही गंभीर मुद्दे मांडले: कायद्याने प्रश्न विचारल्यामुळे त्यांना वगळून सोसायटीचा एक वेगळा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला.पुनर्विकासासंबंधी महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती त्यांच्यापासून लपवली जात असून ते पुनर्विकासाच्या विरोधात असल्याचा खोटा प्रचार करून त्यांना इतर सभासदांपासून एकटे पाडले जात आहे. असाही आरोप केला आहे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना केली विनंती
गेली ३०-३५ वर्षे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या आणि कवी सौमित्र म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या या कलावंताने अखेर सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, तसेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष घालण्याची कळकळीची विनंती केली आहे.