मुंबई : कासारवडवली ते वडाळा या मेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले असून येत्या डिसेंबरपर्यंत मेट्रो रेल्वे सुरू होईल, अशी आनंद वार्ता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढारी न्यूज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनी दिली.
या वर्धापन दिनानिमिताने हॉटेल ट्रायडेंटमध्ये आयोजित महा समिट २०२६ मध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी आणि परिवहन विभागातील आगामी योजना, अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलण्याची सक्त्ती आणि ठाण्यातील विकास कामांवर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी ठाण्यातील वाहतुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री सरनाईक यांनी वडाळा ते कासारवडवली मेट्रो ही डिसेंबरपर्यंत सुरू होणार असल्याचे सांगितले.
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा रद्द केलेला नाही, त्यामुळे महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा बोलता आली पाहिजे, मराठी बोलणार नाही असा मुजोरीपणा खपवून घेतला जाणार नाही, २८ ऑक्टोबर २०२७ पासून पुन्हा कारवाईला सुरुवात केली जाईल असे सरनाईक यांनी सांगितले. रिक्षा-टॅक्सी चालक म्हणून बांगलादेशींनी घुसखोरी केली होती, त्यांना रहिवासासह अन्य कागदपत्रे दिली जात असल्याने कारवाई सुरू केल्याचे सांगितले. या मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहमती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
२२ हजार नवीन बसेस येणार
एसटीची सुधारणा करण्यासाठी येत्या सहा महिन्यांत २२ हजार नवीन बसेस दाखल होणार आहेत. नवीन १८ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी एसटी (शेड्युल कास्ट) ते एसटी बस सेवा विस्तारण्याचा मानस असल्याचे सांगितले. एसटी महामंडळामध्ये इलेक्ट्रिक बसेस घेतल्या जाणार असून राज्यातील प्रत्येक उड्डाणपुलाखाली चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.
धनुष्यबाण हा आमचाच
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार सोडून २०२२मध्ये सत्तेसाठी हिंदुत्व गोठविणाऱ्यांनी पक्षाची धनुष्यबाण गोठविण्याची मागणी केली, हे दुर्दैव आहे. पक्ष आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण हे शिवसेनेला मिळणार असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.