मुंबई : ५ जुलैच्या अतिमुसळधार पावसामुळे कर्जत-लोणावळा घाट मार्गात अनेक ठिकाणी भूस्खलन, दगड कोसळणे आणि बंधारे, वाळू वाहून जाणे अशा घटना घडल्या. त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचे मोठे नुकसान झाले होते. ज्यामुळे ६ जुलै ते २८ जुलै दरम्यान सुमारे ६६५ रेल्वे गाड्यांवर त्याचा परिणाम झाला होता.
अखेर २३ दिवसांच्या आव्हानात्मक दुरुस्ती मोहिमेनंतर हे तिन्ही मार्ग पुन्हा सुरू करून मुंबई आणि पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात मध्य रेल्वेला यश आले. पावसाळा सुरू होताच ५ जुलै रोजीच्या ३२७ मिमी आणि ६ जुलै रोजीच्या ६०० ते ६७० मिमी पावसामुळे खंडाळा आणि मंकी हिल दरम्यान १३० मीटर लांबीचा भराव चार मीटरपर्यंत खचला होता. मंकी हिल आणि ठाकूरवाडी दरम्यान मोठ्या भूस्खलनामुळे एका मोठ्या दगडाने धडक दिल्याने संरक्षक भिंत कोसळली आणि रेल्वेमार्गाचा सुमारे ५० मीटरचा भाग वाहून गेला होता.
बोगदा क्र.५१ मध्ये आलेल्या पुरामुळे खडी वाहून गेली आणि रेल्वेमार्गाची रचना कमकुवत झाली होती. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करणे, मार्ग बदलणे, काही फेऱ्या कमी अंतरावर थांबवणे आणि वेळापत्रकात बदल करण्यात आले होते.
दरम्यान, यापूर्वी खंडाळा आणि मंकी हिल् दरम्यान अप मार्गावरील रेल्वेसेवा २८ जुलै रोज सायंकाळी ६.४२ वाजता सुरू झाली होती. अखेर मध्य रेल्वेने पुनर्बाधणीचे काम पार पाडण्यासाठी रेल्वे कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांसह ११,७४८ कर्मचाऱ्यांना कामाला लावले. अहोरात्र काम करून २३ दिवसांच्या या मोहिमेत अंदाजे १,४०,९४८ मनुष्य-तास काम करून तिन्ही बंद मार्ग पुन्हा सुख केले आहेत.