मुंबई: अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाची कडी असलेल्या शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही भीती व्यक्त केली होती की, अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. त्याच्या जिवाला धोका उद्भवू शकतो.
या घटनेमुळे ही शक्यता अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे. खरात प्रकरणातील सत्यच बाहेर येऊ नये असे काही लोकांना वाटत आहे का? असा सवाल ठाकरे शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला.
जितेंद्र शेळके याचा या गुन्ह्यात सहभाग होता की नव्हता हे कायद्याने ठरवले असते. कुणाचा जीव घेण्याचा अधिकार कुणालाही नाही.जी घटना घडली ती तपास यंत्रणा आणि शासन व्यवस्था यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे अंधारे म्हणाल्या.
हा अपघात असू शकत नाही - दमानिया
जितेंद्र शेळके हे शिवनिका संस्थानावर दुसरे महत्त्वाचे संचालक होते. कल्पना खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यापेक्षा त्यांचे वजन जास्त होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची ईडी चौकशी झाली आणि आज ते अपघातात गेले. हा अपघात असूच शकत नाही, असे अंजनी दमानिया म्हणाल्या.
अपघाताची चौकशी करा - पवार
हा अपघात अत्यंत धक्कादायक असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. अशोक खरातचे कारनामे पुढे येऊ नयेत आणि कोणी अडचणीत येऊ नये म्हणून हा अपघात कोणी घडवून आणला का? असा सवाल करत त्यांनी या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे.