मुंबई: येत्या काळात अत्याधुनिक ‘एसएमआर’ तंत्रज्ञानाच्या आधारे जैतापूर येथील प्रकल्प पूर्ण केला जाणार असून, त्यासाठीचे दोन महत्त्वाचे करारही झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली.
नाणार अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण झाला असता, तर महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत 10 वर्षे पुढे गेला असता. विशेषतः, सध्याच्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीत नाणार प्रकल्प देशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला असता.
गुजरातमध्ये रिलायन्सच्या एका रिफायनरीने जसा संपूर्ण राज्याचा कायापालट केला, तशीच क्षमता नाणार प्रकल्पात होती. या प्रकल्पामुळे कृषी किंवा मासेमारीवर कोणताही विपरीत परिणाम झाला नसता; उलट यामुळे देशाची ऊर्जासुरक्षा अधिक बळकट झाली असती, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मात्र, चुकीच्या गृहितकांचा नाणारला विरोध झाला, या राजकारणाने प्रकल्पाचा बळी घेतला. हा प्रकल्प करू शकलो नाही, याची मनापासून खंत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
आताच्या अद्ययावत एसएमआर तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्पांचे काम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या प्राधिकरणासोबत तसेच रशियाच्या रोसाटॉम कंपनीसोबत करार करण्यात आला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
प्रकल्प गेमचेंजर ठरणार
भारत आता स्वतःचे स्वदेशी एसएमआर विकसित करत असून, ते थोरियमवर आधारित असणार आहे. जगात थोरियमचे सर्वात मोठे साठे भारताकडे आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित झाल्यास ऊर्जासुरक्षेच्या क्षेत्रात भारताशी जगातली कोणतीही महासत्ता स्पर्धा करू शकणार नाही. तामिळनाडूमध्ये यावर आधीच काम सुरू झाले असून, हा उपक्रम जागतिक ऊर्जा क्षेत्रात एक गेमचेंजर ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.