War Impact Pudhari File Photo
मुंबई

War Impact: डोंबिवली-अंबरनाथ औद्योगिक वसाहती अडचणीत; आखाती युद्धामुळे दर महिन्याला 1 हजार कोटींचे नुकसान

युद्धामुळे गॅस टंचाई आणि कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अमेरिका आणि इस्रायलने इराणशी युद्धाचा फटका मुंबईजवळच्या डोंबिवली आणि अंबरनाथ येथील औद्योगिक क्षेत्राला बसला असून दर महिन्याला एकत्रित मिळून 1 हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान होत आहे. युद्धामुळे गॅस टंचाई आणि कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत.

अंबरनाथजवळील आनंदनगर औद्योगिक क्षेत्रातील 50 टक्के तर डोंबिवलीच्या 30 टक्के उद्योगांना या युद्धाचा जबर फटका बसला आहे. कंपन्यांचे उत्पादन रोडावल्यामुळे कामगार आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाल्याचे येथील सूत्रांनी सांगितले.

अंबरनाथ औद्यागिक वसाहतीत सुमारे 2 हजार कंपन्या कार्यरत आहेत, त्यात 400 रासायनिक कंपन्या आहेत, तर डोंबिवलीत सुमारे 1400 कंपन्या आहेत. या दोन्ही औद्योगिक क्षेत्रांत लाखभर कामगार कार्यरत आहेत. याठिकाणी अभियांत्रिकी, रासायनिक, वस्त्रोद्योग, औषध निर्माण, खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या आहेत.

या सर्वांसाठी पीएनजी हा महत्त्वाचा घटक आहे. सध्या 50 टक्केच पीएनजी औद्योगिक क्षेत्राला पुरवला जातो त्यामुळे सर्व कंपन्यांना आपले उत्पादन निम्म्यावर आणावे लागले. तसेच ज्यादा पीएनजी मिळवायचा असेल तर त्यासाठी दुप्पट किंमत मोजावी लागते अशी माहिती अतिरिक्त अंबरनाथ उत्पादक संघाचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली.

या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही राज्य सरकारला पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. त्यामध्ये अनुदान देणे, कर्जावरील व्याजाचे दर कमी करणे, जीएसटी भरण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देणे, औद्योगिक वापरासाठी डिझेलचा पुरवठा सुलभ करणे आदी मागण्यांचा समावेश असल्याचे उमेश तायडे यांनी सांगितले.

दरम्यान युद्धस्थिती आणखी किती काळ राहील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे आमची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. आताच आमच्या अंबरनाथ वसाहतीला दर महिन्याला 500 कोटींचे नुकसान सोसावे लागत आहे.

कल्याण-अंबरनाथ उत्पादक संघाचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले की, कामगारांसाठी जेवण उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. उपाध्यक्ष प्रशांत घोरपडे म्हणाले, रासायनिक कंपन्यांना या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. उत्पादन खर्च वाढला असून उत्पादन मात्र 30 टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला मदत करण्याची आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT