मुंबई/पुणे :दिल्ली, मुंबई, पुण्यासह देशातील सात महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये बांधकाम खर्चात ३४ टक्के वाढ झाली असून, घरांच्या किमती ५९ टक्क्यांनी कडाडल्या आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या घरांचे स्वप्न आणखी महागले आहे.
‘अनारॉक रीसर्च’च्या ताज्या आकडेवारीनुसार, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबादसह सात महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या पाच वर्षांत शहरांमधील घरांच्या किमती बांधकाम खर्चाच्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढल्या आहेत. किमतींमधील ही २५ टक्क्यांची मोठी तफावत खरेदीदारांसाठी परवडणाऱ्या घरांच्या उपलब्धतेबाबत गंभीर संकट आणि विकासकांसाठी नफ्याच्या मार्जिनवर गंभीर धोका दर्शवते.
देशातील मोठ्या शहरांमध्ये २०२१ ते २०२५ या काळात, ‘स्टँडर्ड-प्लस’ निवासी प्रकल्पाच्या बांधकामाचा सरासरी खर्च ३४ टक्क्यांनी (वार्षिक ६.९ टक्के वाढ) वाढला. या कालावधीत बांधकामाचा दर २,६८१ रुपये प्रतिचौरस फूट वरून ३,६०४ रुपये प्रतिचौरस फूट इतका झाला. तर, घरांच्या सरासरी किमती ५९ टक्क्यांनी (वार्षिक १२ टक्के) वाढल्या. त्या ५,८२६ रुपये प्रतिचौरस फूट वरून ९,२६० रुपये प्रतिचौरस फूट इतक्या झाल्या.
किमतींमधील या वाढीपैकी ६६ टक्के वाढ बांधकाम खर्चाशी संबंधित आहे. तर उर्वरित ३४ टक्के वाढ बाह्य घटकांमुळे झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने जमिनीच्या वाढत्या किमती, विकासकांचे नफा आणि बाजारातील मागणी-पुरवठ्याच्या बदलत्या स्थितीचा समावेश आहे.
जमिनीच्या किमती कडाडल्या
बांधकाम प्रकल्पांच्या खर्चात जमिनीचा वाटा हा प्रमुख आहे. महानगरांमधील जमिनींच्या किमती २०२१ आणि जून २०२६ या कालावधीत ५० ते १२० टक्क्यांनी वाढल्या आहेत. नवी दिल्लीमध्ये जमिनीच्या किमती ७० ते १३० आणि बेंगळुरूमध्ये ६० ते १२० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
ग्लास हार्डवेअरच्या खर्चात आठ ते १२ टक्के आणि प्लम्बिंग, इलेक्ट्रिकल खर्चात नऊ ते १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्टीलचा खर्च तब्बल २० टक्क्यांनी कडाडला आहे. सध्या स्टीलची प्रतिटन किंमत सुमारे ७२ हजार रुपये टन आहे. इतर सर्व खर्चात तीन ते सात टक्क्यांची वाढ झाली आहे.