पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ४८ पैकी ४८ जागा मिळतील. असा दावा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि.१८) मुंबई येथे इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केला. यावेळी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार आदी उपस्थित होते. Lok Sabha Election 2024
मुंबई येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत असताना ठाकरे म्हणाले, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला १०० वर्ष धोक्याचे आहे. राजकीय जन्म देणाऱ्या संघालाच भाजप विसरला आहे. आता फक्त भाजपने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला नकली म्हणायच राहील आहे. पुढे बोलत असताना ते असेही म्हणाले की, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४८ जागा मिळतील.
सत्ताधारी हुकूमशाहीचा प्रचार करत आहे. जेव्हा देशाने आक्रोेश केला, नोकरी हवी आहे, भूक लागली आहे तेव्हा भाजपने पाकिस्तानची भीती दाखवली. भाजपच्या मनात पाकिस्तान आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्जिकल स्ट्राईक केला का? असा सवालही यावेळी ठाकरे यांनी उपस्थित केला. आधी व्यक्तीला बदनाम करायचं आणि नंतर त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं, भाजप फक्त तोडा, फोडा आणि राज्य करा हेच ते करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. Lok Sabha Election 2024
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी असा विश्वास व्यक्त केला की, ४ जूननंतर खऱ्या अर्थाने अच्छे दिन येणार आहे. ४ जूनला देशातील जुमला पर्व संपणार आणि महाराष्ट्रातून होणारी लूट इंडिया आघाडी थांबवणार. राम मंदिर प्रकरणाबाबत बोलत असताना ठाकरे म्हणाले की, आम्ही राम मंदिरावर बुलडोझर फिरवणार असा संभ्रम पंतप्रधान लोकांमध्ये निर्माण करत आहेत. पण आम्ही कधीच बुलडोझर फिरवला नाही."
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत की ते ८० कोटी गरिबांना ५ किलो रेशन देत आहेत. आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर १० किलो देऊ. इंडिया आघाडी महाराष्ट्रात ४८ पैकी ४६ जागा जिंकेल. हे लोक स्वतः सांगत आहेत. आमची आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपला पराभूत करेल." पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, "महाराष्ट्रातील बेकायदेशीर 'महायुती' सरकार विश्वासघात आणि कटाच्या आधारे स्थापन झाले आहे. पंतप्रधान स्वत: त्याला पाठिंबा देत आहेत आणि महाराष्ट्रात त्यांच्या सभाही होत आहेत. ते जिथे जातात तिथे ते तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात.
"काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिरावर बुलडोझर चालवेल" या विधानावर बोलत असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणतात, "निवडणूक आयोगाने भडकवणाऱ्यांवर कारवाई करावी. पंतप्रधान स्वतः लोकांना भडकवत आहेत, आपल्या संविधानानुसार सर्व गोष्टींचे संरक्षण केले जाईल.
हेही वाचा