मुंबई: पवई येथील आयआयटी मुंबईतील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आयआयटीतील प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला व अन्य अज्ञात वरिष्ठ तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
साहिलच्या पालकांनी पोलिसांत तक्रार देत मुलाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
मात्र, एवढ्याशा कारवाईने वाकोडे कुटुंबाचे समाधान झालेले नाही. दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह हलवणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
साहिल वाकोडे आयआयटी मुंबईच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. १८ सप्टेंबर रोजी परीक्षेत त्याने मोबाईलचा आणि चॅट जीपीटीचा वापर केल्याचे आढळले.त्यानंतर प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी त्याच्याशी चर्चा करून त्याचे समुपदेशन केले होते.
या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम होणार नाही, असे त्याला सांगण्यात आले. त्यानंतर तो वसतिगृहातील खोलीत गेला. सायंकाळी मित्रांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी खोलीत पाहिले असता साहिल मृतावस्थेत आढळला.
पोलिसांनी साहीलच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी शनिवारी साहीलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल सिस्टम बदलण्याची वेळ आली आहे.
पवई आयआयटीचा कॅम्पस तापलेला आहे. शुक्रवार, शनिवार दोन्ही दिवस संतप्त विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. या आत्महत्यांकडे केवळ विद्यार्थ्यांचे वैयक्तिक अपयश म्हणून पाहता येणार नाही. विद्यार्थ्यांवर निर्माण होणारा शैक्षणिक दबाव, स्पर्धेचे वातावरण आणि संस्थात्मक व्यवस्था यांचाही विचार करण्याची गरज आहे.
तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी अशा घटना का घडतात याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. आम्हाला पारदर्शकता हवी, ठोस बदल हवेत आणि मुख्य म्हणजे जबाबदारी स्वीकारणारे प्रशासन हवे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
पोलिसांकडून साहिलच्या पालकांसह संबंधित विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर व्यक्तींचे जबाब नोंदविले जात आहेत. घटनेशी संबंधित पुरावेही तपासले जात आहेत.
साहीलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी आपल्या जबाबात साहीलचा आयआयटीमध्ये जातीवरून छळ झाल्याचा गंभीर आरोप केला. मागील तीन महिन्यांपासून संचालक शिरीष केदारे यांच्या सांगण्यावरून प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला हे साहीलला जातीवाचक शिवीगाळ करत होते. कोणत्याही खोट्या प्रकरणात गुंतवू शकतो, असे धमकावत होते.
सूर्यनारायण डुल्ला यांनी मानसिक त्रास देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा गंभीर आरोप या जबाबात असल्याने पोलिसांनी प्रा. डुल्ला व अन्य अज्ञात अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसारही गुन्हा नोंदवला आहे. ॲट्रॉसिटीचे कलम लागल्याने प्रा. डुल्ला यांना सर्वप्रथम अटक होईल, असे समजते.
साहीलच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत नमूद व्यक्तींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सर्व संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
मानसिक त्रास दिल्याचा आराेप
साहिलच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या आई-वडिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.
साहिलवर मानसिक दबाव आणि छळ करण्यात आल्याचा आरोप त्याच्या आईने केला असून, मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
साहिलच्या वडिलांनीही आयआयटी मुंबई प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. चौकशी आणि कारवाई होईपर्यंत मुलाचा मृतदेह घेऊन आयआयटी बॉम्बेच्या परिसरातच ठिय्या देण्याचा पवित्रा त्यांनी जाहीर केला.
आयआयटी बॉम्बेने मात्र परीक्षेतील मोबाईल-चॅट जीपीटीचा वापर पकडला गेल्यानंतर साहिलवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती. संस्थेच्या म्हणण्यानुसार, परीक्षेदरम्यान साहिलकडे मोबाइल आढळला आणि त्याने प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर टाकून उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न केला होता.
समुपदेशन झाल्यानंतर तो हॉस्टेलवर परतला होता. परीक्षेतील घटनेनंतर साहिलशी नेमकी काय चर्चा झाली, पालकांनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे आणि त्याच्या मृत्यूच्या आधीच्या घटनाक्रमात कोणाची भूमिका होती, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.