IIT Bombay student ends life : आयआयटी बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याने जीवन संपवल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि शैक्षणिक संस्थांमधील तणाव यांबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या कल्याणाला प्राधान्य मिळण्यापूर्वी अजून किती विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागेल?, असा सवाल 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. तर विद्यार्थ्याने उचललेल्या टोकाच्या पावलावर आयआयटी मुंबईनेही खुलासा केला आहे.
साहिल वाकोडे असे जीवन संपवलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो 'एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग' विभागाचा दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी होता. त्याच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, परीक्षेत स्मार्टफोन वापरताना आढळल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती.
विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात आले होते आणि विभागप्रमुखांनी त्याला खात्री दिली होती की, या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असेही संस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, संस्थेच्या प्रशासनाकडून जबाबदारी व पारदर्शकतेची मागणी करत विद्यार्थ्यांच्या एका गटाने निदर्शने केली. विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात चर्चा सुरू असताना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कॅम्पसमध्ये कर्मचारी तैनात केले आहेत.
विद्यार्थ्यांच्या कल्याणाला प्राधान्य मिळण्यापूर्वी अजून किती विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागेल?, असा सवाल 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. दिपके यांनी 'एक्स' (X) वर पोस्ट केले की, हे संकट केवळ दुर्गम आदिवासी भागांपुरते किंवा विशिष्ट भौगोलिक क्षेत्रापुरते मर्यादित नाही; मुंबईतील ही घटना विद्यार्थ्यांसमोरील व्यापक समस्येचा पुरावा आहे. दुर्गम आदिवासी भागांत विद्यार्थी जीव गमावत आहेत आणि मुंबईसारख्या महानगरातही ते जीव गमावत आहेत. हे संकट भौगोलिक सीमांच्या पलीकडचे आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाला प्राधान्य मिळण्यापूर्वी अजून किती विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागेल?" असा सवाल दिपके यांनी केला आहे.