पुढारी ऑनलाईन डेस्क : कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (Maharashtra Monsoon update)
पालघर- १२ जुलै ते १३ जुलै
ठाणे- ११ जुलै ते १४ जुलै
मुंबई- ११ जुलै ते १४ जुलै
रायगड, रत्नागिरी- १० जुलै ते ११ जुलै
सिंधुदुर्ग- १० जुलै ते १२ जुलै
नाशिक- ११ जुलै ते १२ जुलै
पुणे, सातारा- १० जुलै ते ११ जुलै
कोल्हापूर -११ जुलै
ईशान्य आणि त्याला लागून असलेल्या पूर्व भागात पुढील २ दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात १२ ते १५ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गोव्यात पुढील ५ दिवसांत मुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पालघरमध्ये १२ जुलै आणि १३ जुलै दरम्यान तसेच ठाणे, मुंबईत पुढील ३ दिवसांत १४ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरीला आज आणि उद्या जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्गमध्ये आज आणि पुढील दोन दिवस यलो अलर्ट असेल. नाशिकमधील घाट भागात ११ जुले आणि १२ जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, साताऱ्यात दोन दिवस जोरदार पावसाचा अलर्ट दिला आहे. कोल्हापूरमध्ये उद्या ११ जुलै रोजी जोरदार पाऊस पडणार असल्याने येथेही यलो अलर्ट दिला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील २४ तासांत सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि अधूनमधून मध्यम पाऊस पडेल. येथील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२ अंश सेल्सियस आणि २५ अंश सेल्सियसच्या आसपास राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासांत तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची नोंद झाली आहे.