नवी मुंबई: नवी मुंबईत रात्रभर मुसळधार झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी तुंबले होते. ट्रान्सहार्बर मार्गावरही पाणी आल्याने कोपरखैरणे ते तुर्भे रेल्वे स्थानकादरम्यान रुळाखालील खडी वाहून गेली. परिणामी पहाटे ५ नंतर रेल्वे वाहतूक बंद ठेवावी लागली. सुमारे दोन ते अडीच तास या मार्गावर लोकल सेवा ठप्प होती. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
नवी मुंबईत २४ तासांत सरासरी १२५.२३ मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे एपीएसीतील भाजी व फळ बाजाराच्या आवारात गुडघाभर पाणी तुंबले होते. शहरात अठरा ठिकाणी झाडे पडल्याची तर तीन ठिकाणी शाॅटसर्किट होण्याच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.
कोपरखैरणे ते तुर्भे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाखालील माती आणि खडी वाहून गेली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाने पहाटे ५ नंतर या मार्गावरील वाहतूक बंद केली. त्यामुळे पनवेल ते ठाणे आणि वाशीत ठाणे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर काम हाती घेतले. दुरुस्ती झायानंतर सकाळी ७.२८ वाजता ठाण्याच्या दिशेने व ७.३५ वाजता नवी मुंबईच्या दिशेने रेल्वेची वाहतूक सुरु करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
ठाणे-बेलापूर मार्गावर प्रचंड गर्दी
ठाणे- बेलापूर मार्गावरही पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. सकाळी साडेदहा ते अकरा वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली. जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोठी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
२४ तासात झालेला पाऊस(मिमीमध्ये)
बेलापूर १३९.४०
नेरूळ १३६.९५
वाशी १२२.५०
कोपरखैरणे ११५.६०
ऐरोली १२२.५५
दिघा ११४.४०