Maharashtra Heatwave Pudhari
मुंबई

Maharashtra Heatwave: राज्यात मार्चपासून उष्माघाताचे 226 रुग्ण; आरोग्य विभाग अलर्ट

दोन मृत्यू, सहा संशयित मृत्यूंची नोंद

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्र लाट पसरली असून उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मार्च ते 20 मे या अडीच महिन्यांच्या कालावधीत राज्यातील उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 226 वर पोहोचली आहे. विशेषतः मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात केवळ चार दिवसांत तब्बल 171 जणांना उष्माघाताचा फटका बसल्याने राज्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. राज्यात 6 संशयित मृत्यूंची नोंद झाली.

राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा संशयित मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. अकोला आणि लातूर येथे मृत्यूंची पुष्टी झाली असून अहमदनगर, अकोला, लातूर आणि सोलापूर येथे संशयित मृत्यूंची प्रकरणे समोर आली आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांसाठी भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेची लाट आणि उष्ण-दमट हवामानाचे वारंवार इशारे दिले जात आहेत. 15 मे रोजी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी ‌‘यलो अलर्ट‌’ जारी करण्यात आला होता.

राज्याच्या जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, सर्वाधिक 41 रुग्ण औरंगाबादमध्ये आढळले. नंदुरबारमध्ये 24, नाशिकमध्ये 19, बुलढाण्यात 17, अमरावतीत 16 आणि वर्ध्यात 14 रुग्णांची नोंद झाली आहे. पालघर, रायगड आणि ठाणे यांसह मुंबई महानगर क्षेत्रातूनही उष्माघाताची प्रकरणे समोर आली आहेत.

डॉ. प्रशांत बोराडे यांनी सांगितले की, चक्कर येणे, डोकेदुखी, अशक्तपणा आणि स्नायूंमध्ये गोळे येणे ही सुरुवातीची लक्षणे अनेक जण दुर्लक्षित करतात. लहान मुलांच्या शरीरातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने त्यांच्यात चिडचिड आणि सुस्ती वाढू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

यांनी काळजी घेण्याची गरज

कडक उन्हामुळे लहान मुलांनाही फटका बसत असल्याचे चित्र आहे. फुटबॉल खेळताना आठ वर्षीय मुलाला अचानक ताप, उलट्या, चक्कर आणि अशक्तपणा जाणवल्यानंतर रुग्णालयात दाखल करावे लागले.तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, राज्यातील अनेक भागांत तापमान 38 ते 45 अंश सेल्सिअसदरम्यान पोहोचत असल्याने उष्णतेशी संबंधित आजार वाढत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, मैदानी कामगार आणि प्रवासी अधिक काळजी घ्यावी.

उष्णतेशी संबंधित आजार टप्प्याटप्प्याने वाढतात. सुरुवातीला ‌‘हीट क्रॅम्प्स‌’ होऊन स्नायूंमध्ये गोळे येणे आणि अतिघाम येतो. त्यानंतर ‌‘हीट एक्झॉशन‌’मध्ये तीव्र अशक्तपणा, चक्कर, डोकेदुखी आणि मळमळ जाणवते. मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार आणि हृदयविकार असलेले रुग्ण यांनी अधिक काळजी घ्यावी.
- डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT