मुंबई : महापौरपादचा पदभार स्वीकारल्यानंतर रितू तावडे यांनी फेरीवालामुक्त मुंबई मोहीम हाती घेतली आहे. गेले काही दिवसांत अतिक्रमण विभागाने रस्ते व पदपथावरील बेकायदा फेरिवाले, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर बुलडोजर फिरविला आहे. सोमवारी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कारवाई केलेल्या परिसरांना भेटी देत पाहणी केली. यापुढेही अतिक्रमणांवर बुलडोझर सुरूच राहील, कोणतीही हयगय न करता न्यायालयाच्या आदेशानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
‘एफ दक्षिण’, ‘एफ उत्तर’ व ‘जी उत्तर’ विभाग कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील काही भागांची त्यांनी पाहणी केली. विशेषतः दादर परिसरास भेट देऊन कारवाईचा सविस्तर आढावा घेतला. यानंतर आयुक्तांनी, फेरीवाल्यांची उपजीविका हिरावून घेणे हा मोहिमेमागील हेतू नाही तर, मुंबई महानगरातील सार्वजनिक जागांचा योग्य वापर सुनिश्चित करणे हा आहे.
त्यामुळे पात्र व नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी अधिकृत हॉकर्स झोन निश्चित करणे, त्यांचे सर्वेक्षण करून पुनर्वसनाच्या योजना राबवणे आणि नियमनबद्ध पद्धतीने व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे पादचाऱ्यांचे हक्क सुरक्षित राहतील, तर दुसरीकडे फेरीवाल्यांनाही नियमांच्या चौकटीत रोजगाराची संधी मिळेल.
नागरिकांनीही या मोहिमेत सहकार्य करणे अपेक्षित आहे. जेणेकरून मुंबई महानगर अधिक लोकाभिमुख, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि राहण्यायोग्य बनू शकेल, असेदेखील गगराणी यांनी स्पष्ट केले. यावेळी उप आयुक्त (परिमंडळ 2) प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (विशेष) (अतिरिक्त कार्यभार) विनायक विसपुते यांच्यासह संबंधित विभागांचे सहायक आयुक्त, अधिकारी व अभियंते उपस्थित होते.