नवी मुंबई : कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे महागाईमुळे दूर गेलेला हापूस आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला असून यामुळे आंबाप्रेमींना मनसोक्त हापूसचा आस्वाद घेण्याची संधी मिळत आहे.
यावर्षी कोकणातील लहरी हवामानाचा फटका हापूस उत्पादनाला बसल्याने सुरुवातीला आंब्याची आवक अत्यल्प होती. त्यामुळे मार्च महिन्यानंतरच बाजारात हापूस दाखल होऊ लागला. कमी आवक आणि वाढती मागणी यामुळे सुरुवातीच्या काळात हापूसचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना हापूस खरेदी करणे अवघड झाले होते.
मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून परिस्थिती बदलू लागली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, श्रीवर्धनसह कोकणातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात हापूस बाजारात दाखल होत आहे. याशिवाय कर्नाटक आणि केरळमधूनही आंब्याची आवक सुरू असल्याने बाजारात दररोज सरासरी 60 ते 70 हजार पेट्यांची आवक होत आहे.
परिणामी, हापूसचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. सध्या बाजारात हंगामातील शेवटच्या बहरातील हापूस उपलब्ध असून मे महिनाअखेरपर्यंतच हा आंबा बाजारात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घाऊक बाजारात हापूस 200 ते 600 रुपये डझन
नवी मुंबईतील घाऊक बाजारात सध्या हापूस आंबा 200 ते 600 रुपये प्रतिडझन दराने विकला जात आहे. दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची खरेदी वाढली आहे. ‘आंबाप्रेमींनी हंगामातील शेवटच्या हापूसचा आनंद घ्यावा. पावसाळा लवकर सुरू होण्याची शक्यता असल्याने सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा उपलब्ध आहे, अशी माहिती घाऊक व्यापाऱ्यांनी दिली.