

सांगोला : आंब्याचा यावर्षी हा गोडवा सर्वसामान्यांना मिळणे कठीण झाले आहे. बाजारात अत्यल्प प्रमाणात आंब्याची आवक होत असून दरही चढ़े आहेत. परिणामी, आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.
यावर्षी आंबा मोठ्या संकटाचा ठरला आहे. अवेळी पाऊस, तापमानातील चढ-उतार आणि वातावरणातील बदल, यामुळे आंब्याच्या झाडांना आलेला मोहोर मोठ्या प्रमाणावर गळून पड़ला. सुमारे 95 टक्के बागा मोहोर गऴतीमुळे बाधित झाल्या आहेत. उत्पादन जवळपास संपुष्टात आले आहे. यामुळे बाजारात कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याची आवक दरवर्षी मोठ्या प्रमाणात होते. मात्र यावर्षी खूपच कमी झाली आहे. जेवढा आंबा उपलब्ध आहे, त्याचे दर गगनाला भिडले आहेत.
दुसरीकडे, सोलापूर सांगली, कोल्हापूर परिसरातील स्थानिक आंबा अद्याप पूर्णपणे बाजारात दाखल झालेला नाही. हवामानामुळे स्थानिक आंब्याची वाढही उशिरा होत असल्याने तो आणखी काही दिवसांनीच बाजारात येण्याची शक्यता आहे. अक्षय तृतीयेला आंबा खाण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये जाहे. मात्र, यंदा या परंपरेला काही प्रमाणात खंड पडला आहे. बाजारात कमी आवक आणि जास्त दर यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सध्या केशर हापूस आंब्याचे दर 500 ते 700 रुपये डझन असे पहावयास मिळत आहेत. गावरान आंबाही सध्या भाव खात आहे. काही व्यापाऱ्याच्या मते, पुढील काही आठवड्यांत स्थानिक आंब्याची आवक आवक होईल. दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
मात्र, सध्या तरी आंब्याचा गोडवा केवळ आठवणीतच राहणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे बाजारात कमी माल असल्याने ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. या दुहेरी संकटामुळे आंबा हंगाम यंदा निराशाजनक आहे.