पनवेल/नवी दिल्ली : भारताचा इतिहास शौर्य, समरसता आणि सहकार्याच्या परंपरेने घडला आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपरंपरेतील त्याग आणि सामाजिक एकात्मतेचा विशेष उल्लेख केला. सत्य आणि धर्मासाठी अढळ राहण्याची प्रेरणा आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहादत वर्षानिमित्त नवी मुंबई येथे आयोजित समागमात पंतप्रधान मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होत संबोधित केले. या कार्यक्रमाला रविवारी केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही म्हणून मोदींनी ध्वनीचित्रफितीद्वारे संवाद साधला.
या ऐतिहासिक आणि पवित्र कार्यक्रमाचा भाग होणे ही मोठी भाग्याची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाला सामाजिक ऐक्याची आवश्यकता असताना हे मोठे संमेलन राष्ट्राला आश्वस्त करणारे आहे. गेल्या वर्षी नागपूर येथे सुरू झालेला शहादत समागमाचा प्रवास तख्त श्री हजूर साहिब येथे अधिक दृढ झाला आणि आता नवी मुंबईत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला.