मुंबई: बोगस बियाणे अथवा पावसाने ओढ दिल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट आल्यास त्याला मदत देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
अनेक भागांत शेतकर्यांनी पेरणी केली; पण बोगस बियाणे अथवा पावसाने ओढ दिल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बोगस बियाणे पेरले की ते उगवत नाही किंवा लावलेले बियाणे उद्ध्वस्त होते. शेतकर्यांवर आलेले हे संकट पाहता, पुढे दुबार पेरणीकरिता लागणारा निधी हा ‘डीपीसी’मधून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
दुबार पेरणीसाठी बी-बियाणे सरकार उपलब्ध करून देणार आहे. याविषयीचा अहवाल जिल्हाधिकारी पाठवतील, त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे सांगताना बोगस बियाणे दिले आहे त्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याचे आदेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी पुरवठादारांनी बोगस बियाणे दिल्यामुळे सोयाबीन किंवा कापसाचे पीक उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक भुर्दंड पडू नये, म्हणून पालकमंत्री आपल्या जिल्ह्यातील ‘डीपीसी’ निधीतून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी निधी व बियाणे उपलब्ध करून देतील. या निर्णयाबद्दल बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
शेतात जाण्यासाठी योग्य रस्ते
शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी योग्य रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी सरकारने एक विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म आणि डॅशबोर्ड तयार केला आहे. या माध्यमातून शेत रस्त्यांची मोजणी करणे, रस्ते खुले करणे आणि त्यांना क्रमांक देणे या प्रक्रिया गतिमान केल्या जातील. या प्लॅटफॉर्मद्वारे प्रत्येक शेतकऱ्याच्या रस्त्याबाबतच्या तक्रारीचे थेट मॉनिटरिंग केले जाईल.
आदिवासी बांधवांना वनपट्टे
आदिवासी भागातील ज्या बांधवांना अद्याप वनहक्क पट्टे मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी वनहक्क समितीची पुन्हा बैठक घेऊन पुनर्विलोकन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुनर्विलोकन करून पात्र आदिवासी बांधवांना वनपट्ट्यांचे तातडीने वाटप करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
इगतपुरी येथे पर्यटकांना झालेल्या मारहाणीच्या गंभीर प्रकरणाची दखल घेण्यात आली असून दोषींवर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. उल्हासनगर येथील टेंडर वादातून झालेल्या घटनेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असेही महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.