मुंबई : गोवंडी येथील रोड नंबर ८, संजय नगर महापालिका शाळेत व्यवस्थापनाला धमकावून बकरे बांधण्यात भाग पाडण्यात आल्याचा गंभीर प्रकार मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत उघडकीस आला. शाळा शिक्षणासाठी की पशुपालनासाठी असा सवाल करत सदस्यांनी या विषयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यानिमित्ताने पालिका शाळांतील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
गोवंडीच्या पालिका शाळेला बकरी अड्ड्याबाबत शिक्षण समितीचे स्वीकृत सदस्य निखिल व्यास यांनी मुद्दा उपस्थित केला. आता अभ्यासक्रमात 'अॅनिमल हजबंडरी' विषयही समाविष्ट करणार आहोत का? असा सवाल त्यांनी विचारला. मुंंबई शहराची डेमोग्राफी बदलण्याचा हा प्रयत्न आहे? या मागे नेमके कोण आहे. शाळेचा वॉचमन दबावाखाली येऊन किंवा संगनमत करून काम करत आहे ? या संपूर्ण प्रकरणामागे कोणाचा प्रभाव आहे, याची सखोल चौकशी झाली पाहजे, अशी आग्रही मागणी व्यास यांनी केली.
तसेच चारकोप सेक्टर ४ येथील शाळा बंद असूनही तिथे पाच वॉचमन कार्यरत आहेत. तरीही शाळेत दारुच्या बाटल्या सापडल्याचा मुद्द्यावरही बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला. यावर तक्रार दाखल करण्यात आल्याची त्रोटक माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र या माहितीवर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेने पालिका शाळेतील ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला.
सुरक्षा एजन्सीवर कठाेर कारवाईची मागणी नगरसेवक प्रमोद सावंत यांनी केली. तर पालिका शाळांमध्ये किती सुरक्षारक्षक काम करत आहेत. सुरक्षारक्षकांची संख्या पुरेशी आहे का? यासंदर्भातील ऑडिट करण्याची मागणी नगरसेवक अंकित प्रभू यांनी केली. नगरसेविका स्वप्ना म्हात्रे आणि योगिता कोळी यांनी गोवंडी शाळा प्रकरणात संबंधितांवर तत्काळ कारवाईची मागणी केली.
उपाययोजना करा
बैठकीच्या अखेरीस शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच पुढील बैठकीपर्यंत यासंदर्भातील संपूर्ण अहवाल सादर होईपर्यंत हा हरकतीचा मुद्दा प्रलंबित ठेवा.