मुंबई : नमिता धुरी
गोवंडी येथील 18 झोपडपट्टींच्या समूह पुनर्विकासाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेवर टाकण्यात आली असून यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पात येथील 22 हजार 771 झोपडीधारकांना उंच इमारतीत घर मिळणार आहे, तर पालिकेला अधिमूल्याच्या स्वरुपात किमान 243 कोटी 20 लाख 90 हजार रुपये मिळणार आहेत.
मुंबईतील रखडलेले एसआरए प्रकल्प पूर्णत्वास नेणे एकट्या झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणास शक्य नसल्याने या प्रकल्पांची जबाबदारी राज्य शासनाने इतर काही प्राधिकरणांकडे दिली आहे. यानुसार गोवंडी येथील 18 प्रकल्प पालिका पूर्ण करणार आहे. पालिकेच्याच जमिनीवर असणाऱ्या या प्रकल्पांसाठी पालिकेला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आहे.
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडजवळ हे प्रकल्प आहेत. एकूण 3 लाख 98 हजार 214 चौरस मीटर एवढे या प्रकल्पाचे क्षेत्रफळ आहे. यापूर्वी विकासकाने केलेल्या नोंदीनुसार या प्रकल्पात 22 हजार 771 झोपड्या आहेत; मात्र प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा पात्रता निश्चिती केली जाईल.
या प्रकल्पासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मूळ झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी येथे इमारती बांधल्या जातील. काही घरे प्रकल्पबाधितांसाठीही बांधली जातील. या संपूर्ण पुनर्विकास प्रकल्पातून पालिकेला मिळणाऱ्या अधिमूल्याची रक्कम किमान 243 कोटी 20 लाख 90 हजार रुपये आहे.
प्रकल्पाचा तपशील खालीलप्रमाणे
सर्वांत मोठी योजना
मिलान, तक्वा, सनशाइन, साई एकता, दीपस्तंभ, नवजीवन, अल हजरत, साई, साईलीला : 4060 झोपडीधारक - 69409.41 चौरस मीटर क्षेत्रफळ
सर्वांत लहान योजना
कायनात सीएचएस - 184 झोपडीधारक 5528.72 चौरस मीटर क्षेत्रफळ
प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ : 3 लाख 98 हजार 214 चौरस मीटर
प्रकल्पातील एकूण झोपडीधारक : 22 हजार 771
पालिकेला मिळणारे अधिमूल्य : 243 कोटी 20 लाख 90 हजार रुपये