मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणातील मूळ गावी निघालेल्या प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वेकडून गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र, या विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण ही दोन मिनिटात फुल्ल झाल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर १० सप्टेंबरपासून पुढील सर्व दिवसांची प्रतीक्षा यादी 'रिग्रेट' झाली आहे. अशा काळात रेल्वेने तिकीट विक्रीच बंद केल्याने चाकरमन्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. रेल्वेने तात्काळ याची चौकशी करून अतिरिक्त विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी कोकणवासियांकडून जोर धरू लागली आहे.
येत्या १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सव आहे. त्यापूर्वी १० ते १३ सप्टेंबर दरम्यान मुंबईतून कोकणात गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा ओढा कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्याकडे आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत रेल्वेगाड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने प्रवाशांना तिकिट मिळणे अशक्य झाले आहे.
प्रवाशांची वाढती मागणी पाहता रेल्वेकडून काही विशेष गाड्या आणि नवीन नियमित गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र नव्याने सुरू केलेल्या मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी रोड या गाडीचे आरक्षण सुद्धा दोन मिनिटात फुल्ल झाले. तसेच प्रतीक्षा यादीची मर्यादा ओलांडल्याचे सांगत रेल्वेने तिकीट विक्री सुद्धा बंद केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
चाकरमान्यांची लोकप्रिय (२०१११) कोकणकन्या एक्स्प्रेस गाडीचे सर्व श्रेणीमध्ये आरक्षण १२ सप्टेंबरपर्यंत 'रिग्रेट' दाखवले जात आहे. तशीच अवस्था सर्वाधिक ओढ असलेल्या दादर येथून सुटणाऱ्या (११००३ ) तुतारी एक्स्प्रेसच्या प्रतीक्षा यादीची आहे. बुधवार आणि शुक्रवारी सुटणाऱ्या (१९०५७ ) सुरत मडगाव एक्स्प्रेसची यादी १६ सप्टेंबरपर्यंत रिग्रेट आहे.
मुंबई सेंटर येथून सोडलेल्या ( ०९०१९) मुंबई सेंटर सावंतवाडी विशेष गाडीची प्रतीक्षा यादी १३ सप्टेंबररोजी ३२० अशी आहे. ( १२१३३ ) मंगळुरू एक्स्प्रेस ( १०१०५ ) दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस ( १०१०३ ) मांडवी एक्स्प्रेस,(१२०५१) जनशताब्दी एक्स्प्रेसचे सर्व श्रेणीतील डब्यांची प्रतीक्षा यादी 'रिग्रेट'मध्ये आहे. तेजस एक्स्प्रेसचे आरक्षण रिग्रेट यादीत आहे. ( १६३४५ ) नेत्रावती एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ३०० पार आहे तर ( २२२२९ ) या वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी १५० च्या पुढे आहे.