मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान तस्करीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. तस्करांना पकडूनही दबावाखाली सोडण्यात आल्याच्या घटनेची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथील शेणगाव वन उपक्षेत्रात अवैध सागवानांची तस्करी होत असल्याबद्दल भाजपच्या देवराव भोंगळे यांनी आज प्रश्न विचारला होता. त्याचवेळी काँग्रेसच्या विजय वड्डेटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान तस्करीचा मुद्दा उपस्थित केला. ब्रम्हपुरी मतदारसंघात वनविभागाने सागवान लाकडाने भरलेले दोन ट्रॅक्टर पकडले असताना एका स्थानिक नेत्याने वनविभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत तस्करांना सोडवण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
या दबावामुळे जप्त केलेले ट्रॅक्टर आणि आरोपींना सोडावे लागले, असा दावा करत वडेट्टीवार यांनी हा प्रकार साधी चोरी नसून नक्षलग्रस्त भागात सक्रिय असलेल्या संघटित टोळ्यांचे मोठे रॅकेट असल्याचे सांगितले. या तस्करांचे आणि संबंधितांचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड तपासल्यास राज्यातील मोठ्या सागवान तस्करी जाळ्याचा उलगडा होऊ शकतो, असेही वडेट्टीवार म्हणाले. तसेच नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संरक्षणासाठी शस्त्रे देण्याची मागणीही त्यांनी केली.
या चर्चेला उत्तर देताना नाईक यांनी ब्रम्हपुरीतील घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले. ज्या अधिकाऱ्यांनी दबावाखाली येऊन तस्करांना सोडले, त्यांच्या भूमिकेची तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांचे सीडीआर तपासले जातील. या प्रकरणामागे संघटित टोळी किंवा गुंडांचा सहभाग आढळल्यास त्या संपूर्ण रॅकेटचा बंदोबस्त करून तस्करीचे जाळे उद्ध्वस्त केले जाईल, असा इशाराही नाईक यांनी दिला.