मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी अकरावी प्रवेशाचा बोजवारा उडाला. गेल्या वर्षी ‘पहिले वर्ष’ असल्याचे कारण देत कोलमडलेल्या अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळाने यंदाही विद्यार्थ्यांचा संयम संपवला. महाविद्यालयांचे पसंतिक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू होताच संकेतस्थळ अक्षरशः ठप्प झाले आणि राज्यातील लाखो विद्यार्थी व पालक दिवसभर त्रस्त झाल्याचे पहायला मिळाले. यानंतर आता वेळापत्रकात बदल करत एक दिवशाची मुदतवाढ देण्यात आली.
अकरावी प्रवेशाची कोट्यातील शून्य फेरीचे प्रवेश संपल्यानंतर गुरुवारपासून पहिल्या नियमित फेरीला सुरुवात झाली. या फेरीच्या सुरुवातीलाच पोर्टलने हात टेकल्याने शिक्षण विभागाच्या तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुरुवारी सकाळपासून विद्यार्थी आणि पालक अर्जाच्या भाग-2 मधील कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यासाठी लॉगिन करत होते.
सुरुवातीला प्रक्रिया सुरू असली, तरी काही वेळातच संकेतस्थळ धीम्या गतीने चालू होते आणि अखेर संपूर्ण व्यवस्था कोलमडली. अनेकांना महाविद्यालयांची यादीच व्यवस्थित दिसत नव्हती, तर काहींना प्रत्येक टप्प्यावर ‘एरर’ संदेशाचा सामना करावा लागला. एक दिवस गोंधळात गेल्याने दोन दिवसांच्या मर्यादित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण कशी करायची, या चिंतेने विद्यार्थी आणि पालक अक्षरशः हवालदिल झाले होते.
11 मेपासून विद्यार्थ्यांनी भाग-1 भरला आहे. काहींनी नोंदणी केली आहे. आणि भाग-2 भरून प्रवेशासाठी तयारी केली होती. तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर गुरुवारपासून पसंतीक्रम भरणे, नवीन नोंदणी करणे आणि अर्ज दुरुस्तीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, लाखो विद्यार्थ्यांनी एकाचवेळी लॉगिन केल्यानंतर पोर्टलचा वेग मंदावला आणि अखेर संपूर्ण यंत्रणाच बंद पडली.
पहिल्या पानावरील महाविद्यालयांचीच नावे पुढील पानांवर पुन्हा दिसत होती. एका महाविद्यालयाची निवड केल्यानंतर दुसरे निवडताना ‘एरर’ येत होता. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागत होती अशाच प्रकारच्या तक्रारी राज्यभरातून समोर आल्या.
प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक
21 ते 23 मे
नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जाच्या भाग-1 मध्ये दुरुस्ती, अर्जाचा भाग-2 भरणे तसेच किमान 1 ते कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतिक्रम निश्चित करणे.
24 ते 26 मे
कनिष्ठ महाविद्यालय वाटप प्रक्रिया आणि तपशील पडताळणी.
27 ते 29 मे
पहिल्या फेरीची कटऑफ यादी पोर्टलवर प्रसिद्ध होणार. पात्र विद्यार्थ्यांना एसएमएस पाठवला जाणार. याच कालावधीत विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे.
29 मे
पहिल्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांची माहिती जाहीर होणार.
1 जून
दुसऱ्या प्रवेश फेरीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर होणार.
लाखो विद्यार्थ्यांनी एकाचवेळी नोंदणी सुरू केल्याने काहीकाळ संकेतस्थळावर ताण आला होता. तातडीने कार्यवाही करून दुपारपर्यंत समस्या दूर करण्यात आली. दुपारनंतर कोणतीही मोठी तक्रार आलेली नाही. पुढील प्रक्रियेत निश्चितच सुधारणा करू, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी सांगितले.