मुंबई : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अंतिम फेरी सुरू होत असतानाच विद्यार्थ्यांच्या महाविद्यालय बदलाच्या मागणीने नवा पेच निर्माण झाला आहे. प्रवेश घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांना आपण निवडलेले विषय, विशेषतः बायफोकल अभ्यासक्रमातील विषय संबंधित महाविद्यालयात उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलण्याची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.
दुसरीकडे, अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इन हाऊस कोट्यातील मोठ्या प्रमाणावर जागा अद्याप रिक्त असून, या जागा सरेंडर करून अंतिम फेरीतील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्याची मागणी महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे.
एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या महाविद्यालयातील इन हाऊस कोट्यातील निम्म्यापेक्षा अधिक जागा अद्याप रिक्त आहेत. या जागा आता अंतिम फेरीपूर्वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट केल्यास इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ मिळू शकतो. रिक्त जागा ऑनलाइन प्रक्रियेत आणल्यास प्रवेशासाठी उपलब्ध पर्याय वाढतील आणि अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे, असे प्राचार्यांचे म्हणणे आहे.
अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नियमित तीन आणि पाच विशेष फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम फेरी राबविण्यात येत आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १२ ऑगस्टपासून अंतिम फेरीला सुरुवात झाली आहे. या फेरीत नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याबरोबरच अर्जात दुरुस्ती आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.
अंतिम फेरीसाठी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. याच कालावधीत अर्जात आवश्यक दुरुस्ती करून अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येतील.