मुंबई : अपघात दाखवून मित्राची हत्या करणाऱ्या चारजणांच्या एका टोळीला घाटकोपर युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. मनोज नारायण भंडगे, सुरेंद्र चंद्रहास सोनवडेकर, आतिष भगवान मोरे आणि ऋतुराज शेट्टी अशी या चौघांची नावे आहेत. आर्थिक वादातून अश्पाक मुलानी ऊर्फ निहाल याची हत्या करुन या आरोपींनी हत्येचा पुरावा नष्ट केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अटकेनंतर त्यांना पुढील कारवाईसाठी कणकवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अमीत राऊत आणि मनोज भंडारी या दोघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. २०२२ रोजी सिंधदुर्गच्या कुडाळ, फोंडा घाटात अश्पाक मुलानी याचा अपघात झाला होता. या अपघातात तो त्याच्या बाईकसह खोल दरीत पडला होता.
या घटनेनंतर कणकवली पोलिसांनी अपघाताची नोंद करुन तपास सुरु केला होता. तपासात तो अपघात असल्याचे उघडकीस आल्यानंतर ही केस बंद करण्यात आली होती. या गुन्ह्यांतील मृत व्यक्तीची त्याच्याच मित्रांनी संगनमत करुन हत्या करुन अपघात दाखवून हत्येचा पुरावा नष्ट केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी या गुन्ह्यांतील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे उघडकीस येताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, एपीआय सुहास खरमाटे, धनाजी साठे, महेश शेलार, स्वप्निल काळे, महिला एपीआय वैशाली सरवदे, पोलीस उपनिरीक्षक परबळकर, अरुण सावंत व अन्य पोलीस पथकाने चारही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. त्यांच्या चौकशीत अश्पाकसोबत त्यांचे आर्थिक वाद सुरु होता.
याच वादातून त्यांनी त्याला कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते. तिथे त्याला बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली. त्याची हत्या नसून अपघात दाखविण्यासाठी त्यांनी त्याच्यासह त्याची बाईक खोल दरीत फेंकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाच वर्षांनी या हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आणि चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत दोनजण पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.