मुंबई : मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्याकडे फेब्रुवारी महिन्यात पाच जिवंत काडतुसे आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आयआयटीतील एका विद्यार्थ्याच्या बिहारहून आलेल्या मित्राच्या बॅगेत ही काडतुसे आढळली. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करून संबंधित व्यक्तींना अटक केली असून या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे काम करण्यात आले आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिली.
काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेत नियम 93 अन्वये या मुद्दयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. या प्रकरणात विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणानंतर सुरक्षा रक्षकांनी अधिक तपासणी केली असता दारूच्या बाटल्याही आढळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे बिहारमधील समस्तीपूरमध्ये पोहोचले असल्याचेही यावेळी भाई जगताप यांनी स्पष्ट केले.
या प्रकाराच्या मुळापर्यंत जाऊन साखळी शोधा अशी मागणीही त्यांनी केली. आयआयटी मुंबई ही केंद्र शासनाच्या अखत्यारीतील संस्था असल्याने तेथे तपासासाठी पोलिसांना पूर्वपरवानगीने जावे लागते. याप्रकरणात एका विद्यार्थ्याच्या मित्राच्या बॅगेमध्ये जिवंत काडतुसे आढळून आली होती. सदर विद्यार्थी व त्याचा मित्र हे दोघेही बिहार येथील असून, आयआयटी पवईच्या वसतिगृहात पाहुण्यांना राहण्याची परवानगी असल्यामुळे तो मित्र तेथे आला होता. त्याच्या बॅगेमध्ये आढळलेली काडतुसे बिहारमधून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, असे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.
या प्रकरणी काडतुसे पुरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यालाही अटक करण्यात आली आहे. तसेच ज्याच्याकडून ती विकत घेतली होती त्या व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली असून संपूर्ण साखळी शोधून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही कदम यांनी सांगितले. या घटनेमागील उद्देश काय होता याबाबत अधिक तपास सुरू असून चौकशीच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती सभागृहाला अवगत करून दिली जाईल, असेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.