मुंबई: सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेसाठी वेगवेगळे निकष असू शकत नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) खडसावत मंत्रालय आणि विधान भवनातील कँटीनची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार ‘एफडीए’च्या अधिकारी आणि वकिलांच्या एका पथकाने मंत्रालय तसेच विधान भवनातील कँटीनवर छापा टाकत पाहणी केली. या पथकात ॲड. कैनाझ इराणी, ॲड. फिरोज भरुचा आणि ॲड. सूर्य सम्राट, तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या उपायुक्तांचा समावेश होता.
सुमारे ४० मिनिटे मंत्रालयातील कँटीनची संपूर्ण तपासणी केल्यानंतर या पथकाने विधान भवनाकडे आपला मोर्चा वळवला. मात्र, विधान भवनात प्रवेश करण्यासाठी त्यांना प्रवेशद्वारावर १५ मिनिटे वाट पाहात थांबावे लागले. प्रवेशाबाबत परवानगी मिळाल्यानंतर हे पथक थेट विधान भवनातील कँटीनमध्ये पोहोचले आणि तेथे तपासणी करण्यात आली.
या कँटीनमधील फ्रिजमध्ये खराब भाज्या ठेवलेल्या होत्या. किचनमध्ये पाणी साठलेले होते, चाकूवर गंज चढलेला होता. अस्वच्छ वॉश बेसिन, स्टोअर रूम आणि किचनमध्ये माश्या अशी स्थिती तेथे होती. पथकाने हे चित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपले. सुमारे ४० मिनिटे हे पथक तपासणी करत होते.
मंत्रालय आणि विधान भवन या दोन्ही कँटीनमध्ये वापरले जाणारे तेल, मसाले, धान्य, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला आणि इतर खाद्यसाहित्याची गुणवत्तादेखील पथकाने तपासली. मुदतबाह्य साहित्याचा वापर होत नाही ना? अन्नपदार्थ योग्य तापमानात साठवले जातात की नाहीत? स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे का? आवश्यक परवाने अद्ययावत आहेत का? याचीही छाननी पथकाने केली.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे कँटीन प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विविध कागदपत्रे सादर करणे, स्वच्छतेची व्यवस्था करणे आणि पथकाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी कर्मचाऱ्यांची पुरती धावपळ उडाली.