मुंबई : ‘जिनको हाथ पकडकर चलना था, वो बात पकडकर बैठ गए’ आणि ‘शिंदे किसी से डरते नहीं, मैदान छोडके भागते नहीं,’ अशी शेरोशायरी करत विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजकीय शेरोशायरी करत विधान परिषदेतील नऊ सदस्यांना निरोप दिला.
सुमारे तासाभराच्या या जुगलबंदीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सदस्यांनी आपल्या राजकीय प्रवासाच्या आठवणी सांगत भावुक केले.
तर मुख्यमंत्री म्हणाले, उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्रित होतो; पण 2019 ला काय झाले माहीत नाही. आम्ही वेगवेगळे झालो, असे सांगत त्यांनी एक शेर ऐकवला.
ते म्हणाले, ‘साजिश की सौगात पहन कर बैठ गए, अनचाहे हालात पकडकर बैठ गए, जिनको मेरा हाथ पकडकर चलना था, हैरत है वो बात पकडकर बैठ गए.’ पण, आता आपला रस्ता कुठलाही असला, तरी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. तुमचे नेतृत्व अशा प्रकारे सगळ्या पक्षाला मिळत राहो. राजकारणात तुमची प्रगती होत राहो, अशा शुभेच्छा देतो.
उद्धवजी आमचे सहप्रवासी
उद्धवजी आमचे अनेक वर्षांचे सहप्रवासी राहिलेत. राजकारणात मतभेद असतात, अनेकवेळा वेगवेगळ्या भूमिका असतात. कधी आपण सोबत असतो, कधी संघर्ष करतो; पण या पलीकडचेदेखील एक नाते राजकारणामध्ये असते. ते नाते असते सहप्रवासाचे.
शिंदेंकडून ठाकरेंचा साहेब असा उल्लेख
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निरोपाच्या भाषणातून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे तोंडभरून कौतुक केले; पण त्यांच्या लगत बसलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले नाही. त्यांचा उल्लेख ‘उद्धव ठाकरे साहेब’ असा करत त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभण्याच्या व पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिंदे यांनी डॉ. गोऱ्हे यांचा फायर ब्रँड नेत्या म्हणून उल्लेख केला. अमोल मिटकरी यांना निरोप देताना त्यांनी अजित पवार यांची आठवण काढली.
उद्धव ठाकरे यांचा पलटवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेरोशायरीला उद्धव ठाकरे यांनीही ‘ऐसी कौनसी बात थी, की और किसी का हाथ पकडना पडा,’ अशा शब्दांत शायरीनेच उत्तर दिले. निरोपाच्या भाषणात उद्धव यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यावर मंत्रालयातील प्रवेशाचा पहिला दिवस मी विसरू शकत नाही. मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावरील कर्मचाऱ्यांनी आपले स्वागत केले. तर ‘वर्षा’ सोडून बाहेर पडलो तेव्हा हेलावलेली मनेही मी पाहिली. असे प्रेम काही लोकांच्याच नशीब असते.
13 मे रोजी निवृत्त होणारे 9 सदस्य
उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, संदीप
जोशी, दादाराव केचे आणि संजय केनेकर.