मुंबई : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सुरू झालेला बेबनाव थांबायचे नाव घेत नाही. गेल्या 48 तासांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परस्परांची दोनदा भेट घेत तीव्र नाराजी बोलून दाखवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली, ठाणे, मुंबई या महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाला सांभाळून घेतले. मात्र, शिवसेना या प्रकाराची जाणीव न ठेवता सांगली येथे वेगळ्या प्रकारे वागली. या दोन्ही भूमिकांचा अर्थ लावत आता वारंवार आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ आणि संधी देत राहू असा अर्थ काढू नका, असे भाजपने सुनावल्याचे समजते.
सोमवारी रात्री दत्ता मेघे यांच्या अंत्यसंस्काराहून देवेंद्र फडणवीस परत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. दोन तास चाललेल्या या भेटीत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर शिंदे यांनी उत्तरे दिली. सातारा येथे आम्ही सुरुवात केली नव्हती, तर पालकमंत्री या नात्याने योग्य ती भूमिका न घेता शंभूराज देसाई यांनी आक्रमक धोरण ठेवले होते, असे मुख्यमंत्री बोलल्याचे समजते.
शिंदे यांनी या प्रकरणात भारतीय जनता पक्षाने मन मोठे करून अध्यक्षपद आम्हाला द्यायला हवे, अशी भूमिका शंभूराज देसाई यांच्या मनात होती त्यामुळे त्यांनी काही निर्णय घेतले तर ते सांभाळून घ्यायला नकोत का? अशी विचारणा केल्याचे समजते त्यावर फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आगळीक करायची आणि वरून अध्यक्षपदही मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहायचे, हे चूक असल्याचे सांगितल्याचे समजते.
मंगळवारी दुपारी विधान भवनात सातारा जिल्हा परिषद वादावर पुन्हा एक बैठक झाल्याचे समजते. विधान परिषदेत पोलिस अधीक्षकाला निलंबित करण्याचे अधिकार पीठासीन अधिकाऱ्यांना नाहीत. हे यापूर्वी घडल्याचे सांगितल्यानंतरही पुन्हा बैठक झाली. निलंबन कारवाईचे आदेश ना. स. फरांदे तसेच वसंतराव डावखरे यांनी दिले होते. त्या प्रकरणात ही कारवाई प्रत्यक्षात आली होती, हे लक्षात आणून दिले गेले. रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही निलंबनाचे आदेश दिले आणि ते पाळले गेले, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, त्यासंदर्भात दोन्हीही पक्ष कोणतीही तडजोड करायच्या मन:स्थितीत दिसले नाहीत.
मंगळवारी सातारा पोलिस अधीक्षकांवर कारवाई होणार काय? अशी चर्चा शिवसेना शिंदे गटात सुरू होती. मंगळवारी रात्री शिवसेना शिंदे गटाची बैठक होती. या बैठकीत भारतीय जनता पक्ष आक्रमकपणे कसा त्रास देतो आणि सत्तेत सहभागी करून घेतल्यानंतरही आपला वाटा कसा देत नाही, याबद्दल भूमिका मांडली जाणार होती, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
निरोपाच्या भाषणानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कक्षात जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी काही मागण्या पुढे केल्या. या भेटीची योग्य दखल शिंदे यांच्या गटाने घेतली आहे. बंड करून सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटाला त्रास देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांना भेटतातच कसे? त्यांना वेळ का दिला जातो? त्यांनी विधान परिषदेत निरोपाच्या भाषणात राजकीय मते व्यक्त केली तरी त्यांना भेटीची वेळ दिली का जाते? याबद्दलही आक्षेप व्यक्त केला जातो आहे. सातारा मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद उमटतच राहतील, असे समजते.